मूल होत नसल्याने केली पत्नीची हत्या
By Admin | Updated: June 30, 2016 02:03 IST2016-06-30T02:03:39+5:302016-06-30T02:03:39+5:30
लग्नाला सहा वर्षे उलटूनही मूल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करत पतीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पवईत घडली.

मूल होत नसल्याने केली पत्नीची हत्या
मुंबई : लग्नाला सहा वर्षे उलटूनही मूल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करत पतीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पवईत घडली. सुरेश बीजे (४०) आणि प्रीती सुरेश बीजे (३५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी सुरेशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
पवई येथील साई बागुरडा गावात बीजे दाम्पत्य राहायचे. त्यांचा प्रेमविवाह आहे. लग्नाला सहा वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने दोघांमध्ये खटके उडायचे. प्रीतीवर उपचारही सुरू होते. गेल्या वर्षभरापासून सुरेशलाही डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्याने नोकरी सोडली. त्यानंतर तो घरीच राहायला लागला. तो मारझोड करत असल्याचे प्रीतीने बहीण मीनाला अनेकदा सांगितले होते. मंगळवारी दुपारी प्रीती घरी आली. रात्री आठच्या सुमारास भाजी नेण्यासाठी आलेल्या चुलत बहिणीने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने तिने नातेवाइकांना याबाबत माहिती दिली. नातेवाइकांनी तेथे धाव घेत दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. खिडकीतून पाहिले असता सुरेशने गळफास घेतल्याचे आढळले. छप्पर तोडून सुरेशच्या भावाने घरात प्रवेश केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली प्रीती आणि गळफास घेतलेला सुरेश आढळला. (प्रतिनिधी)
पत्नीवर हातोड्याचे वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल न होण्यावरून मंगळवारी दोघांमध्ये भांडण झाल्याचा संशय आहे. याच रागात सुरेशने हातोड्याने पत्नीच्या डोक्यावर घाव घातले. त्यानंतर तिच्या हाताची नस कापली. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.
प्रीतीच्या डोक्यावर हातोड्याने पाच घाव घालण्यात आले. या प्रकरणी सुरेशविरोधात हत्या करून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सुसाइड नोट पोलिसांना सापडली नाही.
मात्र तेथील एका वीज बिलावर झगडा असे लिहिले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुरेशने हे लिहिले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हे हस्ताक्षर नेमके कुणाचे याचा तपास सुरू असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.