मुंबई-पुणे महामार्गाचे रुंदीकरण रखडले
By Admin | Updated: July 1, 2016 02:56 IST2016-07-01T02:56:04+5:302016-07-01T02:56:04+5:30
मुंबई - पुणे महामार्गावरील खालापूर ते बोरघाट अंडा पॉइंटपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम सात वर्षांपासून रखडले आहे.

मुंबई-पुणे महामार्गाचे रुंदीकरण रखडले
खालापूर : मुंबई - पुणे महामार्गावरील खालापूर ते बोरघाट अंडा पॉइंटपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम सात वर्षांपासून रखडले आहे. या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ होऊनही चौपदरीकरणाला मुहूर्त मिळत नसल्याने स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रवींद्र पाटील यांच्या काळात या बारा किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळाली होती. रुंदीकरणात खोपोली-शिळफाटा येथील दुकाने व घरांची होणारी अडचणही भरपाई देवून दूर करण्यात आली होती. मात्र अजूनही या रस्त्याचे चौपदरीकरण सुरू झालेले नाही.
वर्षभरापूर्वी आ. सुरेश लाड यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून या मार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली. यासाठी साडेपाचशे कोटींचा निधीही मिळाला होता. त्यालाही आता दीड वर्ष झाले आहे. अरुंद मार्गामुळे मोठ्या संख्येने अपघात होत आहेत. दोन वर्षात अपघातांनी शंभरी ओलांडली असून २२ जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही वर्षांत या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच शिळफाटा ते बोरघाट दरम्यान दररोज वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते.
>अधिवेशनात प्रश्न
रुंदीकरणाचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र संबंधित विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून कार्यवाही होत नसल्याने येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहोत, असे आमदार सुरेश लाड यांनी सांगितले.मार्गाची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाने आयआरबीला दिली आहे. मार्गावर टोल आकारण्यात येतो. मात्र तरीही रुंदीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.