इंद्राणीने शीनाची चुकीची जन्मतारीख का नोंदविली?
By Admin | Updated: September 2, 2015 02:38 IST2015-09-02T02:38:01+5:302015-09-02T02:38:01+5:30
शीना हत्याकांड प्रकरणात नवे खुलासे होत असताना आज इंद्राणीचे पती आणि शीनाचे वडील सिद्धार्थ दास प्रथमच समोर आले आहेत. दरम्यान, इंद्राणीने शीनाची जन्मतारीख चुकीची का नोंदविली

इंद्राणीने शीनाची चुकीची जन्मतारीख का नोंदविली?
डिप्पी वांकाणी , मुंबई
शीना हत्याकांड प्रकरणात नवे खुलासे होत असताना आज इंद्राणीचे पती आणि शीनाचे वडील सिद्धार्थ दास प्रथमच समोर आले आहेत. दरम्यान, इंद्राणीने शीनाची जन्मतारीख चुकीची का नोंदविली याबाबत आता पोलीस तपास करीत आहेत.
इंद्राणीने २००२मध्ये शीनाचे जन्म प्रमाणपत्र तयार केले होते. त्यानुसार शीनाची जन्मतारीख १९८९मधील दाखविण्यात आली आहे; पण शीनाचा जन्म ११ फेब्रुवारी १९८७चा असल्याचा दावा सिद्धार्थ दास यांनी केला आहे. इंद्राणीने शीनाची जन्मतारीख चुकीची का नोंदविली यावर आता तर्कवितर्क केले जात आहेत. पीटर व इंद्राणी हे जोडपे वर्षभरात एकदा किंवा दोनदा भारतात येत असे. ते जास्तीतजास्त लंडनमध्येच असायचे. मुंबईतील त्यांचे घरही त्यामुळे बहुधा बंदच असायचे, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्राणी ही शीनाचे फेसबुक आणि ट्विटर अकाउंट वापरत
होती. यातून काही माहिती मिळते का याचा पोलीस तपास करीत असून, कदाचित तो महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आता सिद्धार्थ दास यांच्याकडून महत्त्वाची माहिती घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पोलिसांना आता सिद्धार्थ दास यांचे डीएनए नमुने हवे असून, त्या माध्यमातून शीना आणि सिद्धार्थ यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करता येईल. दरम्यान, शीना आणि मिखाईलला मारल्यानंतर त्यांचे मृतदेह नेण्यासाठी ज्या दोन सुटकेस खरेदी करण्यात आल्या होत्या, त्या सुटकेसचा आकार शीना व मिखाईलच्या शरीररचनेशी मिळताजुळता आहे, हे विशेष.
...तर इंद्राणीला फाशी द्या
शीना हत्याकांडानंतर प्रथमच समोर आलेले तिचे वडील सिद्धार्थ दास म्हणाले की, जर इंद्राणीने ही हत्या केली असेल तर तिला फाशी द्या.
आपण इंद्राणीसोबत लग्न केले नव्हते, तर आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो असा खुलासाही दास यांनी केला आहे. शीना व मिखाईल ही माझीच मुले असून इंद्राणी या मुलांची आई आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शीना दहावीत असताना आपण तिच्याशी शेवटचे बोललो होतो. तर, मिखाईलशी काहीच संपर्क नव्हता. कोलकात्यात आपण लग्नानंतर स्थायिक झालो होतो आणि या भूतकाळात वळून पाहण्याची माझी इच्छाही नव्हती. पोलिसांना हवे ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचेही दास म्हणाले.