मुख्यमंत्री आक्रमक होतात तेव्हा...
By Admin | Updated: December 17, 2014 23:35 IST2014-12-17T23:35:43+5:302014-12-17T23:35:43+5:30
मुंबईत रखडलेल्या विकासकामांच्या मुद्यावरून विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले

मुख्यमंत्री आक्रमक होतात तेव्हा...
योगेश पांडे, नागपूर
मुंबईत रखडलेल्या विकासकामांच्या मुद्यावरून विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. केंद्रीय कायद्यांमुळे विकासकामांत अडथळे निर्माण होत आहेत. राज्य शासन यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करीत आहे. सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असताना प्रत्येक मुद्यावर राजकारण कसले करता या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्तापक्षातील सदस्यदेखील आश्चर्यचकित झाले.
‘एमएमआरडीए’ने तयार केलेल्या नवीन नियमावलीला मान्यता देण्याबाबत अॅड.अनिल परब यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विचारणा केली होती. ‘मेट्रो’ आणि मोनो सेवेसाठी लागणाऱ्या बांधकामांना परवानगी देण्याबाबत स्पष्ट तरतूद नसल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याची ‘एमएमआरडीए’ने शासनास विनंती केली आहे असे लेखी उत्तर शासनाकडून देण्यात आले होते. ‘एमएमआरडीए’ला विशेष नियोजन प्राधिकरण घोषित करण्याची आवश्यकता नाही असेदेखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांबाबत काय अशी विचारणा विरोधकांनी केली.
मुंबईत प्रकल्प मार्गी लागावे यासाठी पंतप्रधानांना समिती बनविण्याची विनंती केली. रखडलेले प्रकल्प लवकर व्हावेत यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. याचे स्वागत करायला हवे. तर उलट विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. यावर मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्यामध्ये समन्वय आहे का असा प्रश्न माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित करताच फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मुंबईतील ‘कोस्टल रोड’संदर्भात २०११ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय घेतला. परंतु केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी नाकारली.
त्यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान दोघेही काँग्रेसचे होते. मग त्यांचा समन्वय नव्हता का? आम्ही प्रयत्न तरी करतो आहे. राजकीय विचारणा कराल तर राजकीय उत्तरच मिळेल. अकारण राजकारण करण्याचा प्रयत्न करु नका असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.