कुशावर्तात तीर्थ टाकण्याची आवश्यकता काय?
By Admin | Updated: October 2, 2015 00:17 IST2015-10-02T00:17:58+5:302015-10-02T00:17:58+5:30
सिंहस्थ कुंभमेळा पर्व सुरू झाल्यानंतर जगभरातील सर्व तीर्थांचे अस्तित्व गोदावरी नदीत येते, असा उल्लेख शास्त्रांमध्ये असताना

कुशावर्तात तीर्थ टाकण्याची आवश्यकता काय?
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्व सुरू झाल्यानंतर जगभरातील सर्व तीर्थांचे अस्तित्व गोदावरी नदीत येते, असा उल्लेख शास्त्रांमध्ये असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इतर ठिकाणाहून तीर्थ आणून ते कुशावर्तात टाकण्याची आवश्यकता का भासली, असा प्रश्न शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केला. मुख्यमंत्री हिंदू धर्माला मानत नसतील तर ते हिंदू कसे, असे सवाल करून त्यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.
गंगाघाटावरील खेमजी आरोग्य भवन येथे पत्रकार परिषदेत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती बोलत होते. सिंहस्थ कुंभपर्वात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानससरोवर तसेच अन्य तीर्थांचे पाणी कुशावर्तात टाकले आणि त्यामुळे भारत-चीन संबंध दृढ होणार, असे सांगितले जात असले, तरी हे तीर्थ घेऊन चीनचा नेता का आला नाही, असे सांगून कुशावर्तात तीर्थ टाकण्याची गरजच नसल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी शिर्डीच्या साईबाबांसंदर्भात वक्तव्य केल्याने इंदूर येथील एका भक्ताने शंकराचार्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, नंतर या भक्ताने तो दावा मागे घेतला. मात्र, या संदर्भात शंकराचार्यांनी घाबरून माफी मागितली, अशी अफवा काहींनी पसरविली. त्यामुळे ‘मी माफी मागितलेली नाही आणि पूर्वी जे वक्तव्य केले होते त्यावर मी ठाम असून, शास्त्राला मानणारा माणूस आहे आणि जो शास्त्राला मानतो तोच खरा संत असतो. साईबाबांनी कधी हिंदू शास्त्राला मानले नाही. त्यांच्या मुखात सदैव अल्लाह् मालिक असेच शब्द असायचे. त्यांनी कधी एकादशीचा उपवास केला नाही त्यामुळे ते हिंदू संत कसे ठरू शकतात?’ असा सवाल त्यांनी केला. (वार्ताहर)