विशेष परीक्षेसाठी नेमके विद्यार्थी किती?
By Admin | Updated: August 20, 2014 01:02 IST2014-08-20T01:02:59+5:302014-08-20T01:02:59+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणीसाठी विद्यापीठाने

विशेष परीक्षेसाठी नेमके विद्यार्थी किती?
नामांकन नोंदणीचा आकडा गुलदस्त्यात : विद्यापीठाचे मौन संशयास्पद
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणीसाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना १४ आॅगस्टची मुदत दिली होती. परंतु ही मुदत उलटून ५ दिवस उलटून गेल्यानंतर अद्याप विशेष परीक्षेला बसणारे नेमके विद्यार्थी किती याचा आकडा नसल्याची सबब विद्यापीठाकडून समोर करण्यात येत आहे. महाविद्यालयांनी दावा केल्यापेक्षा कमी विद्यार्थी असण्याची दाट शक्यता असून यासाठीच हा आकडा लपविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यापीठाने यासंदर्भात मौन धारण केले आहे.
एकही नियमित शिक्षक नसल्याच्या कारणावरून विद्यापीठाने २५० महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती. असे असताना यातील ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा दावा केला. या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेला राज्यपाल कार्यालयाकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर प्रशासन तयारीला लागले आहे.
विशेष परीक्षेकरिता ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थी पात्र असल्याचा दावा करण्यात येत असला तरी नेमके किती विद्यार्थी परीक्षेला बसतील ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणीसाठी माहिती १४ आॅगस्टपर्यंत तर परीक्षा अर्ज २१ तारखेपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. नामांकन करण्यासाठीची अंतिम मुदत टळून ५ दिवस झाले असताना अद्याप नेमके विद्यार्थी किती याची आकडेमोड झाली नसल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्रसिद्धी समन्वयक श्याम धोंड यांना यासंदर्भात वारंवार विचारणा केल्यानंतर त्यांनीदेखील माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्याकडे नेमकी माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर धोंड यांनी दिले.
जर विद्यापीठाला २८ तारखेपासून परीक्षा घ्यायची आहे तर नेमक्या किती विद्यार्थ्यांची नामांकन नोंदणी होणार आहे याची माहिती लपविण्याचे नेमके कारण काय याबद्दल निरनिराळ्या शंका उपस्थित करण्यात येत आहे.महाविद्यालयांनी दावा केल्याप्रमाणे ६,६१६ इतके विद्यार्थीच नसून वास्तविक आकडा हा फारच कमी आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून माहिती देण्यात चालढकल करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.