आठवडे बाजार बंदला विरोध
By Admin | Updated: July 1, 2016 02:11 IST2016-07-01T02:11:07+5:302016-07-01T02:11:07+5:30
आठवडे बाजार हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. तो हिरावण्याचा कोणालाही अधिकार नाही.

आठवडे बाजार बंदला विरोध
लोणावळा : आठवडे बाजार हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. तो हिरावण्याचा कोणालाही अधिकार नाही. लोणावळा शहरातील आठवडे बाजार बंद करून कोणीही गोरगरिबांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा नागरिकांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आठवडे बाजार बंद करू इच्छिणाऱ्यांना दिला आहे. लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी व नगरसेवक यांनीदेखील आठवडे बाजार बंद होणार नाही. वेळ पडल्यास आठवडे बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा विचार करू, असे म्हटले आहे.
मागील १२ वर्षांपेक्षा अधिक काळापासून लोणावळ्यात हुडको कॉलनीशेजारील नगर परिषदेच्या खेळाच्या मैदानावर शुक्रवारच्या दिवशी आठवडे बाजार भरतो. मावळातील सर्वांत मोठा आठवडे बाजार अशी या बाजाराची ओळख आहे. सुमारे पाचशे दुकाने या बाजारावर लावली जातात. यामध्ये भाजीपाला, किराणा माल, संसारोपयोगी वस्तू, कपडे, फळे, सुक्की मासळी अशा सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. लोणावळा शहरासह परिसरातील कुरवंडे, कुसगाव, ओळकाईवाडी, औंढे, औंढोली, डोंगरगाव, डोंगरगाववाडी, कुसगाववाडी, वरसोली, वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, पांगोळी, कुणेगाव, आपटी, गेव्हंडे, सदापूर, कार्ला, मळवली, वेहेरगाव, दहिवली, शिलाटणे आदी गावांचे लोक बाजारासाठी येतात. लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होत असते. नगर परिषदेला बाजारापासून २० ते २५ हजारांचे उत्पन्न दर आठवड्याला मिळते. उन्हाळा व थंडी असे आठ महिने हा बाजार हुडको कॉलनीजवळ भरतो. पावसाळ्यात सदर ठिकाणी चिखल होत असल्याने चार महिने सिद्धार्थनगर ते शाळा क्र. १ मार्ग, रायवूड परिसरात बाजार भरविला जातो. (वार्ताहर)
>नागरिक, संघटनांच्या संतप्त प्रतिक्रिया
मागील दोन आठवड्यांपासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा बाजार सिद्धार्थनगर येथे सुरू झाला आहे. मात्र, या बाजारामुळे मार्गावर वाहतूककोंडी होत असल्याने घराकडे म्हणजे वर्धमान सोसायटीकडे जाण्यास त्रास होत असल्याची भूमिका घेत लोणावळ्यातील सर्व व्यापाऱ्यांनी नगर परिषदेला निवेदन दिले आहे. त्यात बाजारामध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी केली आहे. नगर परिषदेच्या सभागृहात सर्व नगरसेवक व व्यापारी यांची या संदर्भात बैठक पार पडली. यामध्ये हा आठवडे बाजार बंद करण्याचा सूर काही मंडळींनी आळवला. अनेक मत-मतांतरे झाली. बाजार इतरत्र हलविण्याबाबतही साधकबाधक चर्चा झाली. मात्र, बाजार इतरत्र हलविल्यास त्या भागातील स्थानिक नागरिकदेखील त्या विरोधात आंदोलन करतील. सध्या भरत असलेला बाजार हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक बाजारहाटसह वस्तू खरेदीसाठीदेखील लोणावळ्यात येत असल्याने बाजार हा शहरातच असावा, अशी भूमिका काही नगरसेवकांनी मांडली. चर्चेअंती पावसाळ्यात चार महिने बाजार बंद ठेवण्यावर चर्चा सभागृहात करण्यात आली. ही चर्चा सभागृहाच्या बाहेर रंगल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत बाजार बंद करण्याचा प्रयत्न करू नका, तो शेतकऱ्यांचा मूलभूत हक्क आहे. हा बाजार बंद करून गोरगरिबांचे शाप घेऊ नका. जनता या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरून लोणावळा बेमुदत बंद करेल, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांसह काही राजकीय पक्ष व संघटनांनी दिल्या आहे.