आम्ही भिकारी नाही असे ठणकावत स्वाभिमानी, रासप महायुतीतून बाहेर
By Admin | Updated: September 24, 2014 13:16 IST2014-09-24T12:51:28+5:302014-09-24T13:16:00+5:30
जागावाटपावरुन महायुतीमध्ये अखेर फुट पडली असून राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी संघटना व शिवसंग्राम संघटना या लहान घटक पक्षांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही भिकारी नाही असे ठणकावत स्वाभिमानी, रासप महायुतीतून बाहेर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - शेवटच्या क्षणापर्यंत गोड बोलून झुलवत ठेवलं आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी संघटना व शिवसंग्राम संघटना या लहान घटक पक्षांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अखेर शिवसेना व भाजपा या दोन महायुतीतील मोठ्या पक्षांच्या जागावाटपाच्या लठ्ठालठ्ठीत लहान घटकपक्षांचा बळी गेल्याचे व त्याविरोधात बंड करत या पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे महादेव जानकर व सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
आम्ही शिवसेनेसोबत होतो परंतु त्यांनी आम्हाला भिका-यासारखं वागवल्याची बोचरी टीका जानकर यांनी केली असून आम्ही भिकारी नसल्याचे सांगताना स्वतंत्र लढू आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर या दोन्ही पक्षांचा दांभिकपणा उघड करू असे म्हटले आहे. शिवसेना - भाजप नेत्यांनी अखेरपर्यंत झुलवत ठेवले व अवघ्या सात जागा देऊन अपमान केला अशी घणाघाती टीका करत महायुतीतून बाहेर पडणार असल्याची घोषणा रासपचे महादेव जानकर यांनी केली आहे.
जागावाटपावरुन शिवसेना - भाजप यांच्यात तणाव निर्माण झाला होता व युती तुटेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अखेरीस मंगळवारी शिवसेना - भाजप नेत्यांमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत युती टिकवण्यासाठी शिवसेना - भाजपने महायुतीतील लहान पक्षांना सात जागा देण्याची दर्शवली होती. या प्रस्तावावर राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी संघटना आणि शिवसंग्राम संघटना या घटक पक्षांनी नाराजी दर्शवली. बुधवारी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व स्वाभिमानी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महायुतीतून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली. बुधवारी संध्याकाळी सहा वाजता आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असून त्यावेळीच हा निर्णय का घेतला याविषयी आमची परखड भूमिका मांडू असे दोघांनीही स्पष्ट केले.