‘वुई आर लिव्हिंग, कनेक्टिव्हिटी लॉस्ट’!
By Admin | Updated: April 23, 2017 02:44 IST2017-04-23T02:44:44+5:302017-04-23T02:44:44+5:30
भूतानला आठवडाभर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दिशा छटवाल, अनिसा जंजिरा आणि नर्गिस सिद्दिकी या तिघा तरुणींवर काळाने आकस्मिकपणे घाला घातला.

‘वुई आर लिव्हिंग, कनेक्टिव्हिटी लॉस्ट’!
- गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई
भूतानला आठवडाभर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दिशा छटवाल, अनिसा जंजिरा आणि नर्गिस सिद्दिकी या तिघा तरुणींवर काळाने आकस्मिकपणे घाला घातला. त्यांची कार जवळपास एक हजार किलोमीटर खोल दरीत कोसळल्याने, त्यांना जीव वाचविण्याची थोडीही संधी मिळाली नाही. मृत्यूच्या तीन तास आधी ‘वुई आर लिव्हिंग, कनेक्टिव्हिटी लॉस्ट’ असा घरच्यांना मोबाइलवरून मेसेज पाठविला होता. दुर्दैवाने तोच त्यांच्यातील शेवटचा संवाद ठरला.
दिशा ही विलेपार्ले पूर्वच्या नेहरू रोडवरील अंकिता अपार्टमेंटमध्ये तिची आई पम्मी आणि बहीण मंशा यांच्यासोबत राहात होती. जंजिरा ही मुंबई तर नर्गिस ही नवी दिल्लीची राहाणारी आहे. तिघी ४ एप्रिलला सिक्कीम आणि भूतान फिरण्यासाठी निघाल्या. सिक्कीमला गेल्यानंतर कारने त्या भूतानला जाणार होत्या. त्या नेमक्या कोणत्या प्रवासी कंपनीतर्फे गेल्या, याबाबत घरच्यांनाही माहिती नव्हती. यापूर्वीदेखील दिशाने अशा अनेक ‘पिकनिक’ केल्या होत्या. ऐन वेळी स्वत:च इंटरनेटवरून माहिती मिळवित, त्यांनी सुट्टीची योजना आखल्याचे एका नातेवाईकाचे म्हणणे आहे. १४ एप्रिल रोजी त्या परतीच्या प्रवासाला निघणार होत्या.
१२ एप्रिल रोजी संध्याकाळी ७च्या सुमारास दिशाने तिच्या आईला मेसेज करत, ‘आम्ही लवकरच निघू, इथे नेटवर्क नाही,’ असे सांगितले. या मेसेजच्या तीन तासांनंतर भूतान परिसरात त्यांची कार जवळपास हजार किलोमीटर खोल दरीत कोसळली. यात तिघींसह भूतानमधील एका स्थानिकाचाही मृत्यू झाला. तो गाइड, तसेच कारचालक म्हणून त्यांच्यासोबत गेला होता. मात्र, नेटवर्क नसल्याने या अपघाताची माहिती छटवाल कुटुंबीयांना १४ एप्रिलला मिळाली.
‘नन आॅफ देम सरवाइव्ह’ !
दिशा, नरगिस आणि अनिशा या भूतानला फिरायला गेल्याचे त्यांच्या मोजक्या मित्र-मैत्रिणींना माहीत होते. ‘नन आॅफ देम सरवाइव्ह’ असा मेसेज काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी केल्यानंतर ही बाब इतर परिचितांना समजली. फेसबुकवर दिशाची बहीण मंशा हिने वर्सोवाच्या चारबंगला परिसरातील गुरुद्वारात शुक्रवारी होणाऱ्या शोकसभेबाबत लिहिल्यानंतर सर्वांना धक्का बसला. नेहमी हसतमुख दिशा आपल्यातून निघून गेली आहे, यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. शोकसभेत अनेकांना अश्रू आवरता येत नव्हते. हुंदके देत त्यांनी मैत्रिणीच्या आठवणींना उजाळा दिला.
स्थानिकांमुळेच सापडले मृतदेह
अपघात झालेले ठिकाण पूर्णपणे डोंगराळ परिसर आहे. खोलवर दरीमुळे या ठिकाणी रहदारी फारशी नसते. निर्जन भागात स्थानिक रहिवासी जनावरे चरविण्यासाठी नेतात. त्यांच्यामुळे अपघाताची माहिती स्थानिक प्रशासनाला समजली, अन्यथा आम्हाला मुलींचे मृतदेहदेखील सापडले नसते, असे दिशाची आत्या गगन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भूतान आर्मीची मदत !
तीनही तरुणींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले. अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या घरी नेणे शक्य नसल्याने, त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी भूतान सैन्यदलाची मदत घेण्यात आली. भूतान सरकारने तरुणींच्या आधारकार्डसह सर्व कागदपत्रे, तसेच त्यांचे सामान आणि सोबत नेलेली रोख रक्कमदेखील त्यांनी परत केली.