उद्योगांना पाणीबंदी!
By Admin | Updated: September 2, 2015 02:41 IST2015-09-02T02:41:56+5:302015-09-02T02:41:56+5:30
दुष्काळाचे संकट ओढावलेल्या भागातील जनतेला पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विदर्भ, कोकण आणि नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात उद्योगांना पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय सकारने घेतला आहे

उद्योगांना पाणीबंदी!
अतुल कुलकर्णी, मुंबई
दुष्काळाचे संकट ओढावलेल्या भागातील जनतेला पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विदर्भ, कोकण आणि नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात उद्योगांना पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय सकारने घेतला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. शिवाय, पुढील पावसाळ्यापर्यंत राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठ्यावर महसूल विभागाचा ताबा राहील. त्या पाण्याचा वापर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर अवलंबून असेल.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची अत्यंत बिकट अवस्था आहे. राज्यात आजपर्यंत ५३० मि.मी. पाऊस झाला असून तो सरासरीच्या ५६.६ टक्के आहे. तर राज्यातील सर्व प्रकल्पांमध्ये फक्त ४९ टक्के एवढा पाणी साठा शिल्लक आहे.
-----------
या उद्योगांवर होईल परिणाम
मराठवाड्यात औषधी निर्माण, डिस्टीलरी आणि ब्रेव्हरीज अशा तीन प्रकारच्या उद्योगांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. मात्र पाणीच शिल्लक नसल्याने या उद्योगांवर परिणाम होईल, असे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषणकुमार गगराणी यांनी सांगितले.
चाकण औद्योगिक वसाहतीत आॅटोमोबाईल इंडस्ट्रीज् असल्याने तेथे तुलनेने कमी पाणी लागते. पण तेथेदेखील वेळ पडल्यास पिण्याच्या पाण्यास प्राधान्य द्यावे लागेल, असेही गगराणी यांनी सांगितले.
-----
2171 दलघमी क्षमतेच्या जायकवाडीत आज ४% पाणी शिल्लक आहे. तर पुर्णा-यलदरीत ३%, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, तेरणा येथे ०% तर नांदेडच्या उर्ध्व पैनगंगामध्ये २३४ दलघमी पाणीसाठा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत टंचाईग्रस्त भागातील पाणी उद्योगांना दिले जाणार नाही, असे महाजन यांनी सांगितले.
तिजोरी रिकामी करू - मुख्यमंत्री
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारपासून दौऱ्यावर असून, आज त्यांनी लातूरमधील काही गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. गरज पडली तर दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याची तिजोरी रिकामी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
मृत साठ्यावर तहान । जलसंपदा विभागाचे लाभक्षेत्र विकास सचिव शि.मा. उपासे यांनी सांगितले की, रांजणगाव एमआयडीसीला घोड धरणातून पाणीपुरवठा होतो; पण त्या ठिकाणी 0% पाणी आहे.
तर उजनी धरणात आजच उणे ८.५% पाणीसाठा आहे.
-----------
उजनीचे क्षेत्र मोठे असून, त्यातील मृत पाणीसाठादेखील ६४ टीएमसी एवढा होतो. हे पाणी पिण्यासाठी वापरायचे ठरवले तर किमान २ वर्षे पुरेल. परतीचा पाऊस मध्य महाराष्ट्रात पडतो असा आजवरचा अनुभव असल्याने आम्ही आशावादी आहोत.
----------
धरणात ४९ % पाणीसाठा
राज्यातील जल प्रकल्पांत ४९% साठा असून, गेल्या वर्षी याच सुमारास ६६ टक्के पाणीसाठा होता.
दोन हजार गावांना टँकरने पाणी
१५७६ गावे व २८९६ वाड्यांना आजमितीस १९८९ टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी याच काळात ३५० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.