‘उल्हास’चा पाणीपुरवठा सुरळीत
By Admin | Updated: June 29, 2016 02:50 IST2016-06-29T02:50:50+5:302016-06-29T02:50:50+5:30
जिल्ह्यात गेले पाच दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनदीत बऱ्यापैकी पाणी साठा निर्माण झाला आहे.

‘उल्हास’चा पाणीपुरवठा सुरळीत
सुरेश लोखंडे,
ठाणे- जिल्ह्यात गेले पाच दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनदीत बऱ्यापैकी पाणी साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी आदी शहरांचा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
या शहराना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात अद्याप १८०.०३ पैकी केवळ १६.३१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे, तर उल्हासनदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात ३३९.१४ पैकी फक्त १९.०६ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. धरणांमधील या अल्प पाणी साठ्यामधून शहरांना सुरळीत पाणीपुरवठा करणेच शक्य नाही. पण या धरणांच्या खाली असलेल्या नदी, नाल्याचे पाणी उल्हासदीसह मोहने बंधारा, जांभूळ आदी बंधाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी साठलेले असल्यामुळे त्याचा रोजच्या पाणी पुरवठ्यासाठी वापर केला जात आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणांऐवजी उल्हासनदी खोऱ्यात व माळशेज घाटात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. या परिसरातील पावसाचे पाणी उल्हासनदीच्या उपनद्या, नाल्यांव्दारे आल्यामुळे उल्हासनदीच्या पात्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
वाहून जाणाऱ्या या पाण्याचा वापर टेमघर व एमआयडीसीकडून दैनंदिन
पाणी पुरवठ्यासाठी केला जात आहे. यामुळे सध्या तरी या यंत्रणांकडून ठिकठिकाणच्या शहरांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे. आठवड्यातून पाच दिवस पाणीपुरवठा बंद न करता ती कपात टप्प्याटप्प्याने मागे घेतली जात आहे.
>मध्य रेल्वे वेळेत : गेले दोन दिवस कोलमडलेले मध्य रेल्वेचे वेळापत्रक मंगळवारी मात्र दिवसभर सुरळीत होते. कर्जतसह कसारा मार्गावरील सीएसटीला जाणाऱ्या सर्व लोकल वेळेनुसार धावत होत्या. सकाळच्या पहिल्या सत्रात १० मिनिटे विलंबाने धावणाऱ्या लोकल दुपारनंतर वेळेवर धावल्या. त्यामुळे लाखो चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात फारसा त्रास झाला नाही. संध्याकाळच्या तिसऱ्या सत्रात लोकल वेळेत धावल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
>भातसातील २५ एमएलडी पाण्यावरून मीरा-भाईंदर व ठाणे महापालिकेत संघर्ष
भार्इंदर - मीरा-भार्इंदर शहराला भातसा धरणातील २५ एमएलडी पाणी मिळण्याबाबतचा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठाणे शहराच्या कोट्यातून मागितलेले पाणी देण्यास ठाणे महापालिकेने विरोध केला असल्याने मीरा-भार्इंदर व ठाणे महापालिकेत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. शहराला स्टेम व एमआयडीसीकडून दररोज मिळणारा पाणीपुरवठा प्रत्येकी ८६ व ५० एमएलडी इतका आहे. यातील एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सध्या १० एमएलडी कपात लागू आहे. ही कपात स्टेमकडून भरून काढली जात आहे. ठाणे महापालिकेच्या कोट्यातून अतिरिक्त १५ एमएलडी पाणीसुद्धा स्टेममार्फतच देण्यात येत आहे. मात्र ही तात्पुरती सोय असून पुरेशा पावसानंतर हा अतिरिक्त पाणीपुरवठा खंडीत होणार आहे.
अलीकडेच भातसा धरणातून ठाणे पालिकेला मिळालेल्या ५० एमएलडी पाण्यापैकी ५ एमएलडी पाणी मीरा-भार्इंदरला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी शहराला मुंबई महापालिकेकडून मिळणारे ५ एमएलडी पाणी गेल्या २ वर्षांपासून बंद आहे. ते पुन्हा सुरु करण्यासाठी प्रशासन मुंबई महापालिकेकडे सतत पाठपुरावा करीत आहे. बारवीतून पावसाळ््यात विसर्ग होणारे पाणी मीरा-भार्इंदरला वळते करण्याचा ठराव दोन वर्षापूर्वीच्या महासभेत मंजूर झाला होता.
२००९ मध्ये शहराला सूर्या धरणातून ११८ व राज्य शासनाने मंजूर केलेले १०० अशी एकूण २१८ एमएलडी पाणीपुरवठा योजना एमएमआरडीएमार्फत राबविण्यात येत आहे. ती वनविभागाच्या लालफितशाही कारभारात अडकली आहे.शहराला शासनानेच मंजूर केलेल्या अतिरिक्त पाणीपुरवठ्यातून ७५ एमएलडी पाणी देण्यास एमआयडीसीने मान्यता दिल्याने त्याचे काम सध्या सुरु आहे. हे पाणी शहराला मिळण्यास दोन वर्षे लागणार आहे. त्यातच मौजे पिसे बंधाऱ्यातून २५ एमएलडी पाणी मिळावे, असा प्रस्ताव सादर केला.हा ठराव भाजपाचे गटनेते शरद पाटील यांनी मांडला असता त्याला सर्वानुमते मान्यता मिळाली. हा पाणीपुरवठा ठाणे पालिकेच्या कोट्यातून मिळणे अपेक्षित आहे मात्र ते देण्यास ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेसह शासनाचेच उंबरठे झिजवावे लागण्याची शक्यता आहे.
पावसामुळे पाणी समस्येला काहीअंशी पूर्णविराम मिळाला आहे. ठाण्यासह, मीरा-भार्इंदर, भिवंडीला पाणीपुरवठा करणाऱ्या शहाड-टेमघर यंत्रणेकडून वाहून जाणारे २९६ एमएलडी पाणी दररोज उचलण्यात येत आहे.
या आधी त्यांच्याकडून केवळ २६० एमएलडी पाणी उचलण्यात येत होते. एमआयडीसी देखील ही पध्दत वापरत असल्यामुळे त्यांच्याकडून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरसह परिसरातील गावाना आता दररोज पाणीपुरवठा केला जात आहे.