शहरात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 01:05 IST2016-04-30T01:05:24+5:302016-04-30T01:05:24+5:30
पवना धरणात पाणीसाठा कमी असल्याने शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

शहरात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा
पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा कमी असल्याने शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचे वेळापत्रक तयार झाले असून, सोमवार किंवा मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल.
पवना धरणातून शहरासाठी प्रतिदिन ४५० एमएलडी पाणी उचलले जायचे. मात्र, मागील पावसाळ्यात पवना धरणात केवळ ८० टक्के पाणीसाठा जमा झाला. हा साठा वर्षभरासाठी अपुरा असल्याने ११ डिसेंबर २०१५पासून शहरात १० टक्के पाणीकपात करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ११ मार्च २०१६ला आणखी पाच टक्के पाणीकपात केली. सध्या प्रतिदिन ३८० एमएलडी पाण्याचा उपसा केला जात असून, धरणक्षेत्रात केवळ पंचवीस टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)