नागरिकांना मागणीपेक्षा जास्त पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 02:40 IST2016-08-25T02:40:55+5:302016-08-25T02:40:55+5:30
पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नसताना महापालिका प्रशासनाने मात्र मागणीपेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचा दावा केला आहे.

नागरिकांना मागणीपेक्षा जास्त पाणीपुरवठा
नवी मुंबई : शहरवासीयांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नसताना महापालिका प्रशासनाने मात्र मागणीपेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचा दावा केला आहे. पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थापनासाठी १८ ठेकेदारांची नियुक्ती केली असून त्यांनी व्यवस्थित काम केले नाही तर कारवाई करण्याची तरतूद आहे. नागरिकांच्या तक्रारीची २४ तासात दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी धारेवर धरल्यानंतर पालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याविषयी करण्यात आलेल्या व भविष्यातील उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती प्रसारित केली आहे. शहरातील एकूण लोकसंख्या १४ लाख ४७९२ गृहीत धरून पाणीपुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिमाणसी १५० लिटर प्रमाणे २६९ एमएलडी एवढी पाण्याची मागणी आहे. प्रत्यक्षात ३३० एमएलडी पुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा व्यवस्थापन करण्यासाठी शहरामध्ये विभागनिहाय १८ ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. या कंत्राटदारांवर पाणीपुरवठा व्यवस्थापन करण्यासाठी पाणीगळती, पंपिंग मशिनरी, दुरूस्ती, ग्राहकांच्या तक्रारी विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतर त्या वेळेत सोडविण्याची जबाबदारी ठेकेदारांवरच आहे. पाणी व ऊर्जा लेखा परीक्षण करण्यात येते. जलवितरण व्यवस्था, दैनंदिन सफाई, जलमापक नोंदी घेणे, पाणी नमुने तपासणी, क्लोरीन मात्रा तपासणे, झोनमधील विहिरींची व कूपनलिकांची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. या कामांसाठी सुशिक्षित व अनुभवी कर्मचारी नियुक्ती करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. ठेकेदारांनी नियमाप्रमाणे कामे केली नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनउर्त्थान कार्यक्रम अंतर्गत सर्व ग्राहकांना जलमापक बसविण्यात आले आहेत. १५ मि. मी. व्यासाच्यावरील घरगुती, वाणिज्य वापराच्या नळ जोडण्यांना एएमआर सुविधेसह जलमापक संबंधित ग्राहकांनी स्वत: बसवायचे आहेत.
शहरवासीयांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी आतापर्यंत १०२७७ अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या आहेत. याशिवाय १४ उच्चस्तरीय जलकुंभामध्ये पंपिंगद्वारे पाणी न घेता पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली आहे. यामुळे पालिकेचे ४८ लाख रूपये वीज देयकाची बचत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील ५७ टक्के परिसरामध्ये २४ तास पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.
>जादा पाणी कुठे मुरते?
शहरात रोज २६९ एमएलडी एवढी पाण्याची मागणी आहे. परंतु प्रत्यक्षात ३३० एमएलडी पाणी पुरविले जात आहे. मागणीपेक्षा तब्बल ६१ एमएलडी जादा पाणी दिले जात आहे. परंतु प्रत्यक्षात नागरिकांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली असताना मागणीपेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचा दावा केला आहे. पालिकेच्या या दाव्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.