पुणे शहराची पाण्याची समस्या अखेर संपणार
By Admin | Updated: July 13, 2016 14:35 IST2016-07-13T14:35:43+5:302016-07-13T14:35:43+5:30
गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी उघडीप घेतली

पुणे शहराची पाण्याची समस्या अखेर संपणार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी उघडीप घेतली. खडकवासला धरणसाखळीमधील पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये सुमारे 12.90 टीएमसी (45 टक्के ) पाणीसाठा तयार झाला असून हे पाणी शहरासाठी राखीव ठेवल्यास पुढील वर्षभर पुरेल एवढे आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत या चारही धरणांमध्ये अवघा 7.10 टीएमसी पाणीसाठा होता. दरम्यान, सोमवार (दि. 13) पासून खडकवासला धरणातून सुरू करण्यात आलेला नऊ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग आज सकाळी अकरा वाजता 4 हजार क्यूसेक करण्यात आला आहे.
पुणे शहराला दररोज एकवेळ पाणी पुरवठा करण्यासाठी वर्षभर तब्बल 13 टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने आॅक्टोबर 2015 अखेर पर्यंत ही धरणांमध्ये अवघा 15 टीएमसी (50 टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून आधी एकवेळ नंतर दिवसआड पाणी कपातीचा सामना पुणेकरांना करावा लागला होता. त्यातच यंदा जून महिना संपूनही पाऊस न पडल्याने या चारही धरणांमध्ये अवघा 7 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे ही कपात वाढण्याचे संकट ओढावले होते. मात्र, 2 जुलैपासून या चारही धरणांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अवघ्या 12 दिवसांमध्ये पाणीसाठा 45 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे या पावसाने तूर्तास पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.