वॉटर फिल्टर कारखाना गायब

By Admin | Updated: June 29, 2015 01:51 IST2015-06-29T01:51:15+5:302015-06-29T01:51:15+5:30

शासनाने अंगणवाड्यांना वॉटर फिल्टर्स पुरवठ्याचे कंत्राट ज्यांना दिले आहे तो कारखानाच अस्तित्वात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़

Water filter factory disappeared | वॉटर फिल्टर कारखाना गायब

वॉटर फिल्टर कारखाना गायब

सोपान पांढरीपांडे/ लाल खान पठाण, नागपूर/गंगापूर (जि़ औरंगाबाद)
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातील २०६ कोटी रुपयांचा साहित्य खरेदी घोटाळा सर्वत्र गाजत असतानाच शासनाने अंगणवाड्यांना वॉटर फिल्टर्स पुरवठ्याचे कंत्राट ज्यांना दिले आहे तो कारखानाच अस्तित्वात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी १३ फेब्रुवारीला एका दिवसात २०६ कोटी रुपयांचे साहित्य विकत घेण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात काही गैरप्रकार झाला असल्याचे नाकारले असले तरी कागदपत्रांमधून अधिक धक्कादायक माहिती समोर येते आहे.
‘लोकमत’ने केलेल्या चौकशीत औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुरातून एव्हरेस्ट इंडस्ट्रीज नावाचा वॉटर फिल्टर कारखाना अस्तित्वातच नसल्याचे उघडकीस आले आहे. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या दस्तावेजांमध्ये या कारखान्याचा पत्ता - मेन रोडजवळ गणपती गल्ली, गंगापूर - ४३११०९ असा दिला आहे. पण प्रस्तुत प्रतिनिधीने या ठिकाणी भेट दिली असता तेथे एक वस्ती आढळून आली़ कारखानाच काय पण साधे दुकानही तेथे दिसले नाही, हे विशेष! या कारखान्याबाबत स्थानिकांकडे चौकशी केली असता एव्हरेस्ट इंडस्ट्रीज अथवा वॉटर फिल्टरच्या कारखान्याबद्दल कधी ऐकलेही नसल्याचे त्यांनी सांगितले़ अशा या कागदोपत्री एव्हरेस्ट इंडस्ट्रीजला महिला व बालकल्याण विभागाने प्रत्येकी ५२२० रुपये या दराने ५००० वॉटर फिल्टर्स अंगणवाड्यांना पुरविण्याचे कंत्राट दिले आहे़



>  सुपरफास्ट आॅर्डर सहा दिवसांत 

हे सर्व प्रकरण मोठे रंजक आहे. ७ फेब्रुवारी २०१५ रोजी उद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल स्टोअर्स व प्रोक्युअरमेंट आॅफिस (सीएसपीओ)ने वॉटर फिल्टर घेण्यासाठी दर मागविले. ९ फेब्रुवारीला एव्हरेस्ट इंडस्ट्रीजने दरपत्रक सादर केले व दोनच दिवसांत म्हणजे
११ फेब्रुवारीला रेट कॉन्ट्रॅक्ट मंजूर झाले. विशेष म्हणजे १३ फेब्रुवारीला एकात्मिक महिला व बाल विकास आयुक्तालयाने ४५०० रु. दराने १५४२६ वॉटर फिल्टर्स अंगणवाड्यांसाठी घेण्याचा प्रस्ताव तयार केला व त्याच दिवशी ५२२० रु. दराने ५००० वॉटर फिल्टर घेण्याचा कार्यादेश काढण्यात आला.
स्वीय साहाय्यकाजवळ मॅडमचा नंबर नाही
यासंबंधी मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांचे स्वीय साहाय्यक कुळकर्णी यांनी त्या लंडनमध्ये असल्याचे सांगितले. मोबाइल क्रमांक मागितला असता माझ्याकडे त्यांचा नंबर नाही; पण तुमचा फोन आल्याचा निरोप त्यांना देतो, असे कुळकर्णी म्हणाले.
श्रीमती मुंडे सध्या पत्रकारांशी बोलू इच्छित नाहीत हे उघड आहे. मात्र, त्यांनी एकच खुलासा करावा. केवळ कागदोपत्री असलेल्या एव्हरेस्ट इंडस्ट्रीज या कंपनीला पुरवठ्याचे कार्यादेश कसे काय दिले आणि महिला व बाल विकास आयुक्तालयाने ४५०० रुपये दर लिहिलेला असताना शासन आदेश ५२२० रुपयांप्रमाणे का निघाला? ५००० यंत्रांचे प्रत्येकी ७२० रु. फरकाने रु. ३६ लाख होतात. ही उधळपट्टी नाही काय?

-------------------

चिक्कीची प्रयोगशाळेत तपासणी करा -अण्णा हजारे
पारनेर (अहमदनगर) : राज्यातील हजारो बालकांना दिल्या जाणाऱ्या चिक्कीमध्ये भेसळ केली जात आहे, ही खेदाची बाब आहे. चिक्कीची प्रयोगशाळेत तपासणी करून त्यात भेसळ आढळल्यास ठेकेदाराला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, अशी परखड प्रतिक्रिया जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांना वाटण्यात येणारी राजगीरा चिक्की मातीमिश्रित असल्याचे जिल्हा परिषदेत उघड झाले होते. त्यानंतर त्यावरून राज्यात गदारोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांनी राळेगणसिद्धीत पत्रकारांशी बोलताना सदोष चिक्कीवरून प्रशासनावर टीका केली. 

राज्यभरातील हजारो बालकांच्या जिवाशी खेळणाऱ्या ठेकेदारांना जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे. चिमुकल्यांच्या आहारातही गैरप्रकार होत असल्याने चिक्कीची प्रयोगशाळेत तपासणी करणे गरजेचे आहे. दोन्ही काँग्रेसने भांडण्याऐवजी चिक्कीचे नमुने तपासून घेतले पाहिजेत; शिवाय ही चिक्की सरकारला चिटकलीय का? याचाही शोध घ्या, असेही ते म्हणाले.

दारूबंदीसाठी पाच लाख सह्या
च्नगर जिल्ह्यात दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी पाच लाख सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. रविवारी अण्णांची सही घेऊन मोहिमेला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सुमारे सातशे ग्रामसभांनी दारूबंदीचे ठराव केले होते.

>  आता दारूबंदीसाठी फक्त खेड्यात नव्हेतर शहरांमध्येही बाटली आडवी करावी लागेल, असे अण्णा म्हणाले. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या माध्यमातून दारूबंदीसाठी अनेक कायदे केले, पण त्याची अंमलबजवाणी होत नसल्याची टीका त्यांनी केली.

चिक्कीप्रकरणी राष्ट्रवादीचा रास्तारोको
जळगाव : महिला व बालकल्याण विभागाने २०६ कोटींची केलेली खरेदी व सदोष चिक्कीप्रकरणी 
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे रविवारी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आॅनलाईन सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमानंतर दुपारी आकाशवाणी चौफुलीवर आंदोलन झाले. मात्र आंदोलक येण्यापूर्वीच चौकात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी भाजपा सरकार व पंकजा मुंडे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. आंदोलन सुरू झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पोलिसांनी ३ महिलांसह ३० आंदोलकांना अटक केली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

Web Title: Water filter factory disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.