पाणीकपात रद्द होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:13 IST2016-08-05T01:13:08+5:302016-08-05T01:13:08+5:30
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होत असलेले पवना धरण ७८ टक्के भरले आहे.

पाणीकपात रद्द होणार?
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होत असलेले पवना धरण ७८ टक्के भरले आहे. त्यामुळे पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमधीलही पाणीकपात रद्द व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरात दररोज पाणीपुरवठा करावा, याबाबत महापालिका सभेतही निर्णय होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात मागील पावसाळ्यात केवळ ८० टक्के पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे ९ डिसेंबर २०१५ला शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. त्यानंतर ११ मार्च २०१६ मध्ये १० टक्क्यांवरून ही पाणीकपात १५ टक्क्यांवर नेण्यात आली होती. धरणातील पाणीसाठा घटतच असल्याने २ मे २०१६पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
दरम्यान, सततच्या पावसामुळे पवना धरणात ७८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यासह मावळ परिसरात जोरदार पाऊसही सुरूच आहे. यामुळे तीन महिन्यांपासून होत असलेला दिवसाआड पाणीपुरवठा रद्द करून दररोज पाणीपुरवठा व्हावा, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गेले वर्षभरापासून दिवसाआड पाणीपुरवठा सहन करीत असलेल्या पुणेकरांना आता दररोज पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी स्तरावर घेण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा निर्णय, आयुक्तांचे पत्र यावरून हा निर्णय घेण्यात आला. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सभेत नगरसेवक काय भूमिका घेतात. याकडे लक्ष लागले आहे. त्यातच आयुक्तांनी मात्र सध्या तरी नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे बुधवारी स्पष्ट केले आहे.
पाणीपुरवठा नियमित सुरू करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल भोसले व माजी विरोधी
पक्षनेते विनोद नढे यांनी आयुक्त
दिनेश वाघमार यांच्याकडे केली
आहे. याबाबत आयुक्तांना
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गतवर्षी कमी पाऊस पडला होता. यंदा मात्र पावसाचे प्रमाण चांगले आहे. दमदार पाऊस सुरूअसल्याने पवना धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.(प्रतिनिधी)