सांडपाण्यावरून दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: June 9, 2016 03:23 IST2016-06-09T03:23:12+5:302016-06-09T03:23:12+5:30
महाड तालुक्यातील वरंध मोहल्ल्यात रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यावरून दोन गटांत झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत झाले.

सांडपाण्यावरून दोन गटांत हाणामारी
महाड : महाड तालुक्यातील वरंध मोहल्ल्यात रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यावरून दोन गटांत झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात तिघे जण जखमी झाले असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारीनुसार दोन्ही गटांतील आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सागर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हमीद पेवेकर हे जाधव यांच्या घराजवळून जात असताना त्यांनी तुमचे सांडपाणी वाहते आहे, ते बंद करा असे सांगितले. मात्र ते सांडपाणी नाही, घराचे बांधकाम सुरू असल्याने बांधकामावर मारलेले पाणी वाहत असल्याचे जाधव यांनी सांगितले. मात्र यावरून वादंग होवून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्या लाठीकाठीचा वापर करण्यात आल्याने सागर जाधव यांच्यासह सुरेश जाधव, हिराबाई जाधव हे तिघे जण जखमी झाले.
हमीद पेवेकर यांनीही या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार आयुब कुडूपकर, फिरोज कुडूपकर, अमिर कुडूपकर, रईस पेवेकर यांच्यासह सुरेश जाधव, हिराबाई जाधव, सागर जाधव आदी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)