वासवानी नासुप्रचा जावई आहे का?
By Admin | Updated: May 31, 2014 01:07 IST2014-05-31T01:07:52+5:302014-05-31T01:07:52+5:30
सात वर्षांंंंंपूर्वी लाच घेताना रंगेहात सापडलेला नागपूर सुधार प्रन्यासचा निलंबित अधीक्षक अभियंता नानक वासवानी या लाचखोरासाठी नासुप्रमध्ये पुन्हा पायघड्या घातल्या जात आहेत. संतापाची

वासवानी नासुप्रचा जावई आहे का?
विश्वस्तांना लाचखोराचा कळवळा कशासाठी?
गजानन जानभोर
सात वर्षांंंंंपूर्वी लाच घेताना रंगेहात सापडलेला नागपूर सुधार प्रन्यासचा निलंबित अधीक्षक अभियंता नानक वासवानी या लाचखोरासाठी नासुप्रमध्ये पुन्हा पायघड्या घातल्या जात आहेत. संतापाची गोष्ट अशी की ज्यांना आपण विश्वस्त म्हणून मोठय़ा विश्वासाने पाठवले तीच माणसं या लाचखोर वासवानीसाठी जीवाचे रान करीत आहेत. वासवानी हा थोर समाजसेवक नाही. लोकहिताच्या कामासाठी तो निलंबितही झालेला नाही. शेण खाताना तो सापडला आहे. असे असताना नासुप्रच्या विश्वस्तांना त्याच्याबद्दल एवढा कळवळा कशासाठी? यामागील त्यांचा ‘शुद्ध’ हेतू कोणता? या महान कार्यासाठी त्यांच्या पदरात काही आर्थिक लाभ पडणार आहेत का? असे प्रश्न सामान्य माणसाच्या मनात या निमित्ताने उभे राहात असतील तर ते चुकीचे कसे म्हणता येतील?
लोकशाही व्यवस्थेत ‘विश्वस्त’ही अतिशय व्यापक आणि उदात्त अशी संकल्पना आहे. विविध संस्थांवर काम करताना या विश्वस्तांनी लोकहिताचे रक्षण करावे, ही समाजाची अपेक्षा असते. नागपूर सुधार प्रन्यासमधील विश्वस्त जनतेचे हित पाहात आहेत की लाचखोरांचे? तीन महिन्यानंतर वासवानी नवृत्त होणार आहे. नवृत्तीपूर्वी त्याला पुन्हा सेवेत घ्यायचे म्हणजे आपोआपच वेतन व सर्व प्रकारचे लाभ मिळतील, यासाठी हा घाट घातला जात आहे. ‘शासनाचे तसे आदेश आहेत, यासंदर्भात जीआर आला आहे,’अशी सबब पुढे करून विश्वस्त मंडळाने वासवानीच्या पुनर्नियुक्तीचे निर्ल्लज्जपणे सर्मथन केले आहे. ‘लोकांची कामे तातडीने निकालात काढा, पैसे खावू नका?’ असाही शासनाचा जीआर आहे. त्याची आठवण या विश्वस्तांना का राहात नाही? किमान नैतिकता म्हणून तरी वासवानीच्या पुनस्र्थापनेला विरोध करता आला असता. पण असे झालेले नाही. पाचही विश्वस्त वासवानीसाठी धडपडत आहेत. भ्रष्ट वासवानीचे सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांशी लागेबांधे आहेत. बिल्डर्ससोबत पडद्यामागे पार्टनरशीप करणारे बरेच नेते वासवानीच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आहेत.
त्यामुळे ते आता वासवानीच्या खाल्ल्या मिठाला जागत आहेत.
नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. पण त्यांच्यावर वासवानीसाठी मंत्रालयातून दबाव आहे. वरिष्ठांचा दबाव झुगारण्याइतपत नैतिक धारिष्ट्य त्यांच्यात नाही. वासवानी हा लाचखोर आणि भ्रष्ट आहे, हे सार्या जगाला माहीत आहे. पण त्याच्यासाठी जीवाचा आटापीटा करणारे नासुप्रचे विश्वस्त कसे आहेत? हेही यानिमित्ताने नागपूरकरांना कळून चुकले आहे. नासुप्रमध्ये लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत, तिथे स्क्वेअर फूटप्रमाणे लाच घेतली जाते. एवढी तत्परता लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे विश्वस्त कधी दाखवत नाहीत. वासवानी सारख्यांची दलाली करताना या विश्वस्तांना लाज कशी वाटत नाही? वासवानी जानेवारी २00७ मध्ये लाच घेताना सापडला. नासुप्रने त्याला निलंबित केले. नासुप्रनेच २00९ मध्ये त्याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करायला मंजुरी दिली. आता तीच नासुप्र वासवानीच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव मंजूर करते, ही शोकांतिका म्हणावी की ‘नोटांतिका’?
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस एकीकडे भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवतात आणि त्याचवेळी नासुप्रमधील त्यांचे दोन शिलेदार वासवानीची तळी उचलतात. फडणवीस चुकीच्या माणसांना पाठीशी घालत नाहीत. मग आता ते गप्प का? आमदार दीनानाथ पडोळे हे सज्जन लोकप्रतिनिधी आहेत. पण त्यांनाही वासवानी हा ‘दीनांचा नाथ’असल्याचा साक्षात्कार अचानक झाला आहे.
या विश्वस्त मंडळातील एका जणाचे तर संपूर्ण आयुष्य दलालीत गेले आहे. रस्ते, पुलाच्या कामासोबतच अधिकार्याच्या बदल्यांतही तो तोंड काळे करीत असतो. अशा विश्वस्तांकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार?
भाजपने भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लोकसभेची निवडणूक लढवली. आता राज्यातील भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर करीत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू आहे. मग नागपुरातील भाजप नेत्यांना वासवानीचे होत असलेले पुनर्वसन का दिसत नाही? त्याच्या विरोधात एकही नेता आवाज उठवित नाही, आंदोलन करीत नाही. हीच का भाजपची भ्रष्टाचाराबद्दलची प्रामाणिक भूमिका? असा प्रश्न नागपूरकरांना भेडसावत आहे.
एक गोष्ट ध्यानात ठेवा, वासवानीसारख्या लाचखोरांची दलाली केली तरी लोकं काहीच म्हणत नाही, आपले काहीच बिघडणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर हा गैरसमज ठेवू नका? याच जनतेने केंद्रातील काँग्रेस सरकारचा माज एका फटक्यात उतरवला. पुढच्या विधानसभा निवडणुकीत तुमची तशी गत व्हायला वेळ लागणार नाही.
गांधीगिरी करा ! एकच प्रश्न विचारा !
दिल्लीपासून गल्लीपर्यंंंंंत असलेल्या भ्रष्टाचाराने आपण सारेच पोळून निघालो आहोत. अलिकडच्या लोकसभा निवडणुकीत आपण आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आणि सत्ताधार्यांना धडा शिकवला. यातून नागपूर सुधार प्रन्यासचे हे विश्वस्त काहीच बोध घेत नसतील तर त्यांना सामान्य माणसाच्या ताकदीची जाणीव करून देण्याची गरज आहे. या विश्वस्तांची नावे अशी- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव घारड, आ. दीनानाथ पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर कन्हेरे, भाजपचे डॉ. छोटू भोयर, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर. लाचखोर वासवानीसाठी जीवाचा आटापिटा करणार्या या विश्वस्तांचा गांधीजींच्या मार्गाने नागरिकांनीच प्रतिकात्मक निषेध करायला हवा. त्यासाठी मनातलं बळ एकवटून एवढंच करा, ‘या विश्वस्तांच्या कार्यालयात, घरी जाऊन त्यांना गुलाबाचे एक फुल भेट देऊन या निर्लज्जपणासाठी त्यांचे अभिनंदन करा, सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमात, समारंभात त्यांची भेट घ्या, त्यांना हात जोडून नमस्कार करा, दंडवत घाला’ आणि एकच प्रश्न विचारा, ‘साहेब, तुम्ही कुणाच्या पाठीशी, लाचखोर वासवानीच्या की आमच्या?’ आणि नंतरचा चमत्कार तुम्हीच अनुभवा. त्याशिवाय त्यांना अद्दल घडणार नाही. आपण जर असे केले नाही तर हे लोकं उद्या आपल्याला विकून मोकळे होतील.