वारी येथील डोहामध्ये गेले आत्तापर्यंत १६८ बळी
By Admin | Updated: August 16, 2016 19:20 IST2016-08-16T19:20:02+5:302016-08-16T19:20:02+5:30
अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी येथील डोहामध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू

वारी येथील डोहामध्ये गेले आत्तापर्यंत १६८ बळी
गोवर्धन गावंडे/ऑनलाइन लोकमत
हिवरखेड, दि. 16 - अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी येथील डोहामध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना १५ आॅगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान घडली. गेल्या 20 वर्षांत आतापर्यंत १६८ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
वारी येथील प्रसिद्ध असलेल्या हनुमान मंदिरामध्ये २६ जानेवारी व १५ आॅगस्ट तसेच सुट्ट्यांमध्ये या ठिकाणी बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यातील पर्यटक, विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. या ठिकाणी असलेल्या या डोहामध्ये आंघोळीसाठी जातात. डोहामध्ये बुडणाऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थी व युवकांचे प्रमाण जास्त असल्याने पोलीस स्टेशनच्या नोंदीवरून समजते. वारी हे गाव १९९० ते ९२ च्या दरम्यान वसल्यानंतर वारी येथे मंदिरासह वान धरण पाहण्यासाठी शालेय सहली येतात. १९९२ पासून ते आत्तापर्यंत १६८ जणांचा या डोहामध्ये बुडून मृत्यू झाला असून यामध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बुडाले आहेत. मागील २ वर्षामध्ये शेगाव, जळगाव या ठिकाणाहुन आलेल्या विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे.
१८ ते २५ पर्यंत वयोगटातील युवक या डोहामध्ये आंघोळीसाठी जातात. त्या ठिकाणी असलेल्या पाण्याचा अंत कळत नसल्याने बुडतात. या ठिकाणी सामाजिक संस्था, पोलीस विभाग, महसूल विभाग यांनी जर येणाऱ्या नागरिकांना डोहाच्या बाजुला सावधानतेचा इशारा देणारा फलक किंवा डोहाच्या आजुबाजूला तार कंपाउंड केले तर अनेकांचे जीव वाचू शकतील. पोलीस पाटील कासोटे यांनी सांगितले की, १९९२ पासून या वान नदीच्या डोहामध्ये आत्तापर्यंत १६८ लोकांना जलसमाधी मिळाली आहे.