वेकोलिचे ढिगारे उठले जीवावर

By Admin | Updated: August 1, 2014 01:10 IST2014-08-01T01:10:11+5:302014-08-01T01:10:11+5:30

तालुक्यात सुमारे १५ कोळसा खाणीतून निघणाऱ्या मातीचे ढिगारे गावालगत व नदीकाठावर टाकले जातात. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात नायगाव, उकणी, बेलोरा, निलजई खाण क्रमांक एक

Wakelee's drooping lifespan | वेकोलिचे ढिगारे उठले जीवावर

वेकोलिचे ढिगारे उठले जीवावर

माळीणची धास्ती: चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, उमरेड येथील गावे दहशतीखाली
रवींद्र चांदेकर - वणी
तालुक्यात सुमारे १५ कोळसा खाणीतून निघणाऱ्या मातीचे ढिगारे गावालगत व नदीकाठावर टाकले जातात. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात नायगाव, उकणी, बेलोरा, निलजई खाण क्रमांक एक व दोन, घोन्सा खुली खाण, मुंगोली, जुनाड, कुंभारखणी, कोलारपिंपरी, पिंपळगाव, भांदेवाडा अशा सुमारे १५ कोळसा खाणी आहेत. त्यात काही भूमिगत तर काही खुल्या आहेत. खुल्या कोळसा खाणींतून कोळसा उत्खनन करताना प्रथम त्यातील माती बाहेर काढावी लागते. ही माती खाणीलगतच्या गावांजवळच टाकली जाते. परिणामी या गावांजवळ आता मातीचे मोठमोठे ढिगारे तयार झाले आहेत. सर्व नियम बासनात गुंडाळून वेकोलि गावालगतच मातीचे ढिगारे टाकून मानवनिर्मित पहाड उभे करीत आहे. पाच वर्षांपूर्वी तालुक्यातील बोरगाव येथे याच ढिगाऱ्यांचे भूस्खलन होऊन महापारेषण कंपनीचा एक मोठा वीज टॉवर जमिनदोस्त झाला होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला होणारा वीजपुरवठा काही दिवस खंडित झाला होता. तसेच गावानजिक टाकण्यात आलेले ढिगारे रस्त्यावर येऊन वाहतूकही ठप्प झाली होती़ तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी त्यावेळी तातडीने बोरगाव येथे धाव घेतली होती. महापारेषणला मोठा फटका बसला होता.
अडीच वर्षांपूर्वी उकणी येथील कोळसा खाणीच्या मातीच्या ढिगाऱ्यांचे भूस्खलन होऊन रस्ताच बंद झाला होता. भूस्खलनामुळे मातीचे ढिगारे व मोठमोठे दगड रस्त्यावर येऊन पडले होते. खाणीजवळील घरांनाही तडे गेले होते. गावाला हादरा बसला होता़. वेकोलिने मात्र त्यावेळीही उदासीनता दर्शविली होती. वेकोलिने पर्यायी रस्ता तयार केला तरी तो उखडलेला असल्याने त्यावरून वाहन चालविणे कठीण आहे.
विदर्भात पुणे जिल्ह्यातील ‘माळीण’च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेडच्या कोळसा खाणींमुळे अनेक गावांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विकासाच्या नावावर सुरू असलेले निसर्गाचे भकासीकरण मानवी जिवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याने आता विकासाची पुर्नव्याख्या करण्याची वेळ आली आहे. डब्ल्यूसीएलने नागपूर जिल्ह्यातील उमरेड व वलनी, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा व इतर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे जमिनीच्या पोटातून कोळसा बाहेर काढताना भूस्खलनाची टांगती तलवार नागरिकांच्या मानगुटीवर ठेवली आहे. त्याच वेळी खुल्या खाणींमुळे मातीचे ढिगारे निसर्गाच्या जिवावर उठले आहेत.
गिळंकृत होण्याची भीती
दरवर्षी पावसाळ्यात कोळसा खाणीलगतची गावे दहशतीत वावरत आहेत. कधी भूस्खलन होऊन ढिगारे खचतील आणि गाव गिळंकृत करतील, याची शाश्वती कुणालाच नाही. परिणामी ग्रामस्थांच्या मनात सतत धास्ती असते. निगरगट्ट वेकोलि प्रशासन मात्र त्याकडे सतत दुर्लक्षच करते. दरवर्षी खाणींजवळील गावांना या ढिगाऱ्यांमुळे पुराचा फटका बसतो. पाण्याचा प्रवाह अडून गावात पाणी शिरते़ त्याचबरोबर खाणीलगत असलेल्या शेतीलाही तलावाचे स्वरूप प्राप्त होते़ या मानव निर्मित ढिगाऱ्यांमुळे वणी तालुक्यातही माळीणची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे त्वरित उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.

Web Title: Wakelee's drooping lifespan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.