मतपरीक्षा संपली, आता प्रतिक्षा निकालाची
By Admin | Updated: October 15, 2014 18:59 IST2014-10-15T17:19:09+5:302014-10-15T18:59:33+5:30
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान करण्यासाठी आता शेवटच्या दोन तासांचा कालावधी शिल्लक असून दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३८.३३ टक्के मतदान झाले आहे.
मतपरीक्षा संपली, आता प्रतिक्षा निकालाची
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी संध्याकाळी सहा वाजता मतदान संपले आहे. संध्याकाळी पाचपर्यंत राज्यात ५४.५ टक्के मतदान झाले असून सहा पर्यंत हा आकडा ६२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल असे निवडणूक अधिका-यांनी सांगितले.
विधानसभेतील २८८ जागांसाठी आज मतदान झाले असून राज्यातील ४,११९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला. सकाळी ११ वाजल्यानंतर मतदानाला प्रतिसाद वाढत गेला. गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागांमध्ये दुपारी तीनपर्यंत मतदान पार पाडले. या भागात सुमारे ४४ टक्के मतदान झाल्याचे समजते. दुपारी मतदान प्रक्रिया संपल्यावर नक्षलवाद्यांनी एका मतदान केंद्रावर गोळीबार केल्याचे वृत्त आहे.
संध्याकाळी पाचपर्यंत झालेले मतदान
नंदुरबार - ६० टक्के
उस्मानाबाद - ६०.४५ टक्के
परभणी - ७१ टक्के
सांगली - ६४.३४ टक्के
ठाणे - ४३.८३ टक्के
वर्धा - ५८ टक्के
यवतमाळ - ५५ टक्के
नांदेड - ५८ टक्के
वर्धा - ५८ टक्के
परभणी - ६१ टक्के
तांत्रिक बिघाडांमुळे मतदान यंत्रे निकामी
नागपूरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदान यंत्र बंद पडले असून मतदानाची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. तसेच नाशिकमधील मनपा शाळेतील एक मतदान यंत्रही बंद पडल्याचे समजते. तर मुंबईतील शिवडी येथेही बीडीडी चाळीतील बूथवर मतदान यंत्र बंद पडले आहे.
मतदार यादीत नाव नसल्याने मशिन फोडले
सातारा येथील पाटण तालुक्यातील भुरकेवाडी येथे एका कार्यकर्त्याने मतदार यादीत नाव नसल्याने व्होटींग मशिन जमिनीवर आदळून फोडले. या घटनेनंतर पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले तसेच केंद्रात नवीन मशिनही बसवण्यात आले.
विदर्भात मुसळधार पाऊस
विदर्भात मुसळधार पावसामुळे मतदानावर परिणाम झाला असून रामटेक येथे मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. वनेर येथे पारशिवनीत आवडेघाटातील एका मतदान केंद्रावर वीज कोसळल्याने एक पोलीस ठार झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
सेलिब्रिटींनीही बजावला मतदानाचा हक्क
सर्वसामान्य जनतेप्रमाणे अनेक सेलिब्रिटींनीही बुधवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदार यादीत नाव नसल्याने गुणी अभिनेता अतुल कुलकर्णीला लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नव्हते. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी त्याने बुधवारी सकाळीच मुंबईत मतदान केले. तर अभिनेता अभिषेक बच्चनने त्याची आई जया बच्चनसह मतदान केले. अभिनेत्री रेखानेही सकाळी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. तर सचिन तेंडुलकरनेही पत्नीनीसह मतदान करत मतदारांना आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. शाहरुख खान, रणबीर कपूर, सलमान खान, आमीर खानची पत्नी किरण राव, किरण खेर, अनुपम खेर आदी मंडळींनी मतदान केली आहे. मतदारांनी आवर्जून मतदान करावे असे आवाहन सेलिब्रीटींनी केले आहे.
नेत्यांनीही केले मतदान
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मतदानाचा हक्क बजावला.