राष्ट्रसंतांचा संदेश जागविण्यासाठी भारतभ्रमण

By Admin | Updated: June 8, 2014 00:57 IST2014-06-08T00:57:10+5:302014-06-08T00:57:10+5:30

‘माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभु दिसला..’ अशी हाक आपल्या भजनातून देऊन तुकडोजी महाराजांनी माणसं शोधण्याचा आणि जोडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंतांचा हा संदेश देशभरात पोहोचविण्यासाठी

Visiting the nation's message to travel to India | राष्ट्रसंतांचा संदेश जागविण्यासाठी भारतभ्रमण

राष्ट्रसंतांचा संदेश जागविण्यासाठी भारतभ्रमण

भंडारा :  ‘माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभु दिसला..’ अशी हाक आपल्या भजनातून देऊन तुकडोजी महाराजांनी माणसं शोधण्याचा  आणि जोडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंतांचा हा संदेश देशभरात पोहोचविण्यासाठी आंधळगावचा ४२ वर्षीय ‘तरुण’ माणसा-माणसातील हरविलेलं  माणूसपण शोधण्यासाठी शनिवारी दुचाकीने भारतभ्रमणावर निघाला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांंपूर्वीही त्यांनी दुचाकीने भारतभ्रमण केले होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना अभिप्रेत असलेल्या माणसाला शोधण्यासाठी किरण सातपुते यांनी दुचाकीने भारतभ्रमण  करण्याचा निर्धार केला आहे. समाजातून संपत असलेली परस्परांप्रतीची सहिष्णुता, सद्भावना वाढीस लागावी, हा या प्रवासाचा उद्देश असल्याचे  त्यांनी सांगितले. या प्रवासाचा खर्च कसा करणार? या प्रश्नावर त्यांनी ‘तुकडोजी महाराज, गाडगेबाबांकडे बँक बॅलन्स होता का? असे अंतर्मुख  करणारे उत्तर दिले.
दररोज २00 कि.मी. चा प्रवास केल्यानंतर रात्र झाली की त्याच गावातील एखाद्या मंदिरात मुक्काम करायचा. तत्पूर्वी मंदिर परिसराची स्वच्छता  करायची. रात्री कीर्तनातून राष्ट्रसंतांचा संदेश जागवायचा आणि  झोपण्यापूर्वी त्याच गावात हात जोडून पोटापुरते अन्न  मागायचे. दुसर्‍या दिवशी  पुढच्या प्रवासाला निघायचे, असा दिनक्रम आखला असल्याचे त्यांनी सांगितले.
६ जून २0११ रोजी भारतभ्रमणाची तयारी केली. दुचाकीने दिल्ली गाठली. त्यावेळी एक सहकारी सोबत होता. त्याच्या निरुत्साहामुळे माघारी फिरावे  लागले. त्याचदिवशी पुन्हा संकल्प केला. त्यानंतर ६ जून २0१२ रोजी भारतभ्रमण करुन परतलो. मागीलवर्षी रेल्वने अमरनाथला गेलो होतो. तिथे   भगवान शंकराचे अस्त्र ‘त्रिशूल’ दिसले नाही. त्याचवेळी संकल्प केला. दुचाकीने अमरनाथला जायचे. तिथे पितळी ‘त्रिशूल’ अर्पण करायचे ठरविले.  हे त्रिशूल नागपूर येथून आणले असून त्यासाठी २१ हजार रुपयांचा खर्च आला. आता सोबत त्रिशूल घेऊन जात आहे.
कुटुंबात आईवडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आहे. गावात स्वत:चे घर असून मंडप डेकोरेशनचा छोटासा व्यवसाय आहे. आपल्या संदेश यात्रेला  कुटुंबांची सहमती असल्यामुळेच मार्ग सुकर झाल्याचे त्यांनी सांगितले. आपला प्रवास हा सद्भावनेचा संदेश आहे. त्यामुळे  प्रत्येक गावात लोकांशी  गप्पा करणार आहे. आपल्याला मंदिरातील गाभार्‍यात नव्हे! तर माणसात देव शोधायचा आहे, असे सांगून या भारतभेटीत राष्ट्रसंतांना अपेक्षित  असलेला माणूस भेटेल, असा विश्‍वास  त्यांनी व्यक्त केला.  (जिल्हा प्रतिनिधी)
 

Web Title: Visiting the nation's message to travel to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.