विपिन इटणकर राज्यात पहिला
By Admin | Updated: June 13, 2014 02:30 IST2014-06-13T02:30:06+5:302014-06-13T02:30:06+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१३मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर केला.

विपिन इटणकर राज्यात पहिला
मुंबई/पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१३मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानच्या गौरव अग्रवाल याने प्रथम स्थान पटकाविले, तर नागपूरच्या विपिन इटणकर याने राज्यातून अव्वल स्थान पटकविले आहे. त्याने देशाच्या यादीत १४वा क्रमांक मिळवला आहे. राज्यातील सुमारे ऐंशी ते नव्वद विद्यार्थ्यांची या परीक्षेत निवड झाली आहे.
आयोगाने डिसेंबर २0१३मध्ये मुख्य परीक्षा घेतली होती; तर मे आणि जून महिन्यात मुलाखती झाल्या. या परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून १ हजार १२२ उमेदवार उत्तीर्ण झाले. यामध्ये ५१७ खुल्या गटातील, ३२६ ओबीसी, १८७ एससी आणि ९२ एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत. यशस्वी उमेदवारांमध्ये १५ अपंग उमेदवारांचाही समावेश आहे. आयोगाने या उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट अ आणि ब या पदांवर नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे.
देशात जयपूरच्या गौरव अग्रवाल याने प्रथम क्रमांक पटकावला आहे; तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीच्या मुनीश शर्मा आणि रचित राज यांनी स्थान पटकविले आहे. उत्तीर्णांच्या यादीत पहिल्या १०मध्ये तीन मुलींनी बाजी मारली आहे. गेली सलग चार वर्षे या परीक्षेत मुलीने पहिला गुणवत्ता क्रमांक मिळविला होता. दुसऱ्या प्रयत्नांत यशस्वी होताना गौरव अगरवालने ही परंपरा खंडित केली आहे.
राज्यातून सुमारे दीडशे उमेदवार अंतिम परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी सुमारे ऐंशी ते नव्वद उमेदवार उत्तीर्ण झाले असून, पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये राज्यातील ४ उमेदवारांचा समावेश झाला आहे. प्रथमच नव्या अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यंदा यूपीएससी परीक्षेला राज्यातून सुमारे साडेतीन लाख उमेदवार बसले होते. त्यामधून मुख्य परीक्षेसाठी साधारण १७ हजार उमेदवारांची आणि मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी ३ हजार उमेदवार निवडले होते. यामधून १,१२२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. उत्तीर्ण उमेदवारांमधून आयएएस १८0, आयएफएस ३२, आयपीएस १५0, केंद्रीय सेवा गट अ ७१0, गट ब १५६ या पदांवर नेमणूक होणार आहे. सध्या या चार प्रकारच्या सेवांमध्ये मिळून १,२२८ रिक्त पदे नियुक्तीसाठी उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने आयोगास कळविले आहे. म्हणजेच निवड झालेल्या सर्वांना नियुक्त्या मिळू शकतील. (प्रतिनिधी)