गावे महाराष्ट्राची, पीक सर्वेक्षण तेलंगणचे

By Admin | Updated: October 3, 2015 03:51 IST2015-10-03T03:50:54+5:302015-10-03T03:51:16+5:30

सीमावर्ती भागात असलेल्या महाराष्ट्रातील १४ गावांवर तेलंगणने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

The villages of Maharashtra, peak survey of Telangana | गावे महाराष्ट्राची, पीक सर्वेक्षण तेलंगणचे

गावे महाराष्ट्राची, पीक सर्वेक्षण तेलंगणचे

शंकर चव्हाण ल्ल जीवती (चंद्रपूर)
सीमावर्ती भागात असलेल्या महाराष्ट्रातील १४ गावांवर तेलंगणने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पहाडावरील या वादग्रस्त गावांसह परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र महाराष्ट्र शासनाने साधे पीक सर्वेक्षण करण्याचेही सौजन्य दाखविले नाही. याचाच फायदा घेत तेलंगण सरकारने येथील कापूस, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे.
या गावांत मराठी भाषिक राहतात. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा १७ जुलै १९९७ रोजी ही १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
दऱ्याखोऱ्या असलेल्या १४ गावांतील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून शेती करणाऱ्या जमिनीचा मालकी हक्क द्यावा, अशी निवेदने दिली. गावात मंत्री आले, पण आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही. शासनाने वनहक्क दाव्याअंतर्गत जमिनीचे पट्टे देण्याची योजना राबविली. मात्र जाचक अट लावल्याने पहाडावर अतिक्रमण केलेल्या या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता आला नाही. मात्र या शेतकऱ्यांना तेलंगण सरकारकडून मालकी हक्क मिळाले आहे, हे विशेष.
सीमावादात असलेली परमडोली, तांडा, कोठा, येसापूर, मुकादमगुडा, महाराजगुडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, पळसगुडा, भोलापठार, लेंडीगुडा ही १४ गावे फाजल अली समितीने निर्धारित केलेल्या आंतरराज्य सीमारेषेनुसार महाराष्ट्र राज्याचीच आहेत.
मागील महिन्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे वादग्रस्त १४ गावांसह पहाडावरील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याबाबत सर्वांना सूचना केल्या होत्या. पण पीक सर्वेक्षण झाले नाही. त्यामुळे पुन्हा ५ आॅक्टोबर रोजी कृषी सहायक, पटवारी व ग्रामसेवकांची संयुक्त बैठक ठेवण्यात आली आहे.
- के. वाय. कुणारपवार, तहसीलदार, जीवती

Web Title: The villages of Maharashtra, peak survey of Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.