गावाकडचा माणूसच मराठीचा वारकरी

By Admin | Updated: January 8, 2017 00:43 IST2017-01-08T00:43:41+5:302017-01-08T00:43:41+5:30

‘मराठी भाषेच्या नावाने गळे काढणारा, जो मराठी उच्चभ्रू समाज आहे, तो इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचा पुरस्कर्ता आहे. मराठीचा प्रत्यक्षातील वापर, मराठीचे मराठीपण टिकवणाराच

The villager of the village is the Marathi warkari | गावाकडचा माणूसच मराठीचा वारकरी

गावाकडचा माणूसच मराठीचा वारकरी

कल्याण : ‘मराठी भाषेच्या नावाने गळे काढणारा, जो मराठी उच्चभ्रू समाज आहे, तो इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचा पुरस्कर्ता आहे. मराठीचा प्रत्यक्षातील वापर, मराठीचे मराठीपण टिकवणाराच मराठी भाषेचा खरा वारकरी आहे. मराठी भाषा खऱ्या अर्थाने वारकरी, महानुभव पंथासह संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांच्या अनुयायांनी जोपासली आहे. मराठीची खरी अस्मिता ग्रामीण भागातच जोपासली जात आहे. जोपर्यंत गावाकडचा माणूस तिची अस्मिता जोपासत आहे, तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी येथे केले.
कल्याणच्या शारदा मंदिरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी एक दिवसाचे विद्यार्थी साहित्य संमेलन झाले, या प्रसंगी जोशी बोलत होते. कल्याण सार्वजनिक वाचनालय, आगरी युथ फोरम आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन झाले. या प्रसंगी महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार नरेंद्र पवार, अभिनेत्री सोनाली खरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, पदाधिकारी भिकू बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. जोशी यांनी सांगितले, ‘विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गोंधळ करावा, त्याविरोधात मी नाही. जे आवडत नाही, ते ठामपणे सांगा. गोंधळ करण्यापूर्वी भाषा, साहित्य, देश, समाज समजून घ्या. मग विरोध करा. विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भाषेचे महत्त्व पटणे, हे अखिल भारतीय मराठीच्या प्रचार आणि प्रसाराचे काम आहे. ज्या शहरात मराठी साहित्य संमेलन होते, तेथून भाषेचा प्रचार-प्रसार संपत नाही, तर तो तेथून सुरू होतो. मायमराठी भाषेत आपल्या माणसावर रागवता येते. एखाद्याला शिवीही आपल्याच भाषेतून कचकचून घालता येते. परभाषेत आपल्याला व्यक्त होता येत नाही. स्वभाषेत आपण चांगले व्यक्त होऊ शकतो. सध्याच्या विद्यार्थी वर्गाकडे अनेक साधने आहेत. आमच्या काळात साधने नव्हती, याकडे जोशी यांनी लक्ष वेधले, तसेच विचारवंतांनी समाजाला दिशा देण्याची गरज आहे,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘हे विद्यार्थी साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीच्या पार्श्वभूमीवर घेतले असले, तरी ते कल्याणमधील अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदी ठरो.’ महापौर देवळेकर यांनी कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. या संमेलनातून त्यांना त्यांचे बालपण आठवले, त्याचा उच्चार त्यांनी केला.
आमदार पवार यांनी सांगितले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकाराने अमळनेर येथे प्रीतिसंगम संमेलन भरवले होते. त्याच संमेलनासाठी माझा पुढाकार होता. तेव्हा मी एक कार्यकर्ता होतो. त्याच संमेलनाची आठवण या निमित्ताने होत असल्याचे सांगून, सर्जिकल स्ट्राइकवरील शहीद जवानांच्या कुटुंबीयांची व्यथा मांडणारी एक कविता सादर केली. अभिनेत्री खरे यांनी सांगितले की, त्यांची आई एका ग्रंथालयात असल्याने त्यांना अनेक पुस्तके वाचता आली. मराठीच्या जागरासाठी प्रत्येक शहरातून विद्यार्थी साहित्य संमेलने घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)

बालकल्याण स्मरणिकेचे प्रकाशन
- विद्यार्थी साहित्य संमेलनानिमित्त तयार केलेल्या बालकल्याण या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्मरणिकेचे संपादन योगेश जोशी
यांनी केले. अत्यंत कमी कालावधीत १२ लेख व ४० कवितांनी ही स्मरणिका तयार केली. त्यात ४० शाळांनी सहभाग घेतला.
- संपादक जोशी यांनी सांगितले की, ‘परदेशात नो टीव्ही
डे साजरा केला जातो. त्या दिवशी विद्यार्थ्यांनी टीव्ही बघायचा नाही. अशा काही संकल्पना आपल्याकडेही
सुरू झाल्यास, विद्यार्थी वाचन-लेखनाकडे वळतील.’
- ही स्मरणिका एका पालखीतून वाजत-गाजत संमेलन व्यासपीठावर आणली गेली. विठ्ठल-रुक्मिणी यांंची वेशभूषा करून विद्यार्थी आले होते. त्यांच्या शिरावर ही स्मरणिका वाहून आणण्यात आली.

Web Title: The villager of the village is the Marathi warkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.