विजयदुर्ग बंदर आंतरराष्ट्रीय बनणार

By Admin | Updated: June 28, 2015 23:30 IST2015-06-28T23:30:42+5:302015-06-28T23:30:42+5:30

मुख्यमंत्र्यांची घोषणा : देवगडचे अर्थकारण बदलणार

Vijaydurg port becomes international | विजयदुर्ग बंदर आंतरराष्ट्रीय बनणार

विजयदुर्ग बंदर आंतरराष्ट्रीय बनणार

अयोध्याप्रसाद गावकर- देवगड --आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर होण्याची क्षमता असलेले विजयदुर्ग बंदर विकासापासून दूर राहिले आहे. मात्र, सावंतवाडी येथे मुख्यमंत्र्यांनी नुकतीच विजयदुर्ग बंदराच्या विकासाची घोषणा केल्यामुळे विजयदुर्ग बंदर आता आंतरराष्ट्रीय बंदर बनण्याची आशा पल्लवित झाली आहे. तसेच आनंदवाडी प्रकल्पालाही वाढीव निधी मंजूर होऊन हाही प्रकल्प काही महिन्यांत सुरू होणार आहे. यामुळे आता या दोन प्रकल्पांमुळे देवगडचे अर्थकारण बदलणार आहे.
निसर्गरम्य परिसर, स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ला व एक सुसज्ज बंदर म्हणून विजयदुर्ग बंदराचा उल्लेख केला जातो. केवळ ९० किलोमीटरच्या अंतरावर समुद्रात वसलेले आंग्रीया बेट ही पर्यटनस्थळे असूनही विजयदुर्ग अजूनही पर्यटनदृष्ट्या विकसित झाले नाही. लाखो पर्यटक दरवर्षी विजयदुर्गला येत असतात. मात्र, पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे पर्यटक खंत व्यक्त करतात.
सन २००८ मध्ये अष्टशताब्दी महोत्सवाने येथील पर्यटनाला चालना मिळाली. किल्ल्यावर झालेले तिसरे दुर्ग साहित्य संमेलन अशा विविध महोत्सवातून येथे पर्यटन राबविण्याचा प्रयत्न केला गेला. केवळ महोत्सव न करता न्याहारी निवास योजनांसारखे उपक्रम विजयदुर्गमध्ये राबवून येथील प्रत्येकाला उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे म्हणून प्रयत्न केले. अष्टशताब्दी महोत्सवावेळी देश, विदेशातून लाखो पर्यटकांनी विजयदुर्गला उपस्थिती दर्शविली होती.
नुकतेच मेमध्ये येथील एका स्थानिकाने विजयदुर्ग खाडीमध्ये पर्यटकांसाठी फेरीबोट सुरू केली आहे. फेरीबोटीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून समुद्राचा पर्यटक आनंद घेत आहेत. विजयदुर्ग हे आंतरराष्ट्रीय बंदर होणार असल्याचे शासनकर्त्यांकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात हे बंदर आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून केव्हा नावारूपास येईल, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर विजयदुर्ग बंदराची विकासाची अंमलबजावणी, प्रतीक्षा, उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
कोकण किनारपट्टीवरील जुन्या काळापासून आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजयदुर्ग बंदराचा शासनाच्या उदासीनतेमुळे विकास झाला नाही. ऐतिहासिक वास्तू व तेथील असणारी भौगोलिक परिस्थिती यामुळे विजयदुर्ग बंदर हे पर्यटनदृष्ट्या व व्यापारी केंद्र म्हणून पूर्णपणे सुसज्ज आहे. जगातील अतिशय सुरक्षित बंदर असून आयात-निर्यातीसाठी या बंदराचा वापर सध्या असलेल्या परिस्थितीतही सहज करणे शक्य आहे.
ही मळी या बंदरातून जपान, कॅनडा या देशांत निर्यात केली जाते. आज नामवंत कंपन्यांच्या बोटी चौगुले कंपनी, गोवा येथील साळगांवकर कंपनीच्या के्रन या बोटीच्या दुरुस्तीसाठी व पावसाळ्याच्या दिवशी सुरक्षिततेच्यादृष्टीनेदेखील या बंदराचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.


आर्थिक सुबत्ता येणार
आनंदवाडी प्रकल्प हा देवगडमधील महत्त्वाचा प्रकल्प असून, हा प्रकल्प काही कारणांमुळे बंद पडला आहे. मात्र, २ जुलै रोजी होणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला २९ कोटींवरून ९२ कोटींपर्यंत निधी मंजूर करून या प्रकल्पाचे काम पुनश्च सुरू होणार असल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिल्याने आता विजयदुर्ग बंदर व आनंदवाडी प्रकल्पाच्या कामांना सुरुवात होणार आहे. यामुळे देवगड तालुक्याचे नाव हे आता अर्थकारणामध्ये रोवून याठिकाणी आर्थिक सुबत्ता निर्माण होणार आहे.

Web Title: Vijaydurg port becomes international

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.