VIDEO : 'जलयुक्त शिवार’ मधून २३ हजार हेक्टरवर संरक्षित ओलित !
By Admin | Updated: October 20, 2016 13:10 IST2016-10-20T12:58:28+5:302016-10-20T13:10:21+5:30
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांमधून सप्टेंबर अखेरपर्यंत १६ हजार ३३९ घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा निर्माण झाला आहे

VIDEO : 'जलयुक्त शिवार’ मधून २३ हजार हेक्टरवर संरक्षित ओलित !
संतोष येलकर, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २० - जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांमधून सप्टेंबर अखेरपर्यंत १६ हजार ३३९ घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा निर्माण झाला आहे. निर्माण झालेल्या या पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यात २3 हजार हेक्टर शेतीच्या संरक्षित ओलितासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांचा यावर्षी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत गत दोन वर्षांपासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यात गत सप्टेंबर अखेरपर्यंत ६ हजार २३० ‘जलयुक्त शिवार’ची कामे करण्यात आली. त्यामध्ये सिमेंट नाला बांध, नदी-नाल्यांचे खोलीकरण-रुंदीकरण, तलावातील गाळ काढणे, नद्यांचे पुनरुज्जीवन व इतर कामांचा समावेश आहे. लोकसहभाग आणि विविध यंत्रणांमार्फत जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करण्यात आली. यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने, जिल्ह्यात करण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामातून सप्टेंबर अखेरपर्यंत १६ हजार ३३९.८२ घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. या पाणी साठ्याचा २२ हजार ९९९ हेक्टर ३ आर शेतीच्या एक संरक्षित ओलितासाठी आणि १२ हजार ६८० हेक्टर २८ आर शेतीच्या दोन संरक्षित ओलितासाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांद्वारे यावर्षी निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना करता येणार आहे.
पूर्ण करण्यात आलेली कामे!
जिल्ह्यात जलयुक्त अभियान अंतर्गत जिल्ह्यात ६ हजार २३० कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यात ९१३, आकोट ७२७, बार्शीटाकळी ६५४ ,बाळापूर ७४५, तेल्हारा ११२८, पातूर १५०८ आणि मूर्तिजापूर तालुक्यात ५५५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
‘या’ कामातून निर्माण झाला पाणीसाठा !
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात शेततळे, ढाळीचे बांध, सिमेंट बांध, सिंचन विहिरी, नाला बांध, शिवकालीन तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव दुरुस्ती इत्यादी कामे करण्यात आली. या कामांमुळे जिल्ह्यात पाणीसाठा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात अशी उपलब्ध झाली संरक्षित सिंचन क्षमता ! (हेक्टर)
तालुका एक संरक्षित सिंचन केल्यास दोन संरक्षित सिंचन केल्यास
अकोला : ३५८० . ८४ २०२३.०१
आकोट : ३४५३. ०७ १९०५.०१
बार्शीटाकळी : ३३४६. ७५ १७७८.००
बाळापूर : १४१२ . ७१ ८४५.५९
पातूर : ५०७८ . ०१ २६८९.४८
तेल्हारा : ४०२४ . ७४ २३०९. ००
मूर्तिजापूर : २१०२ . २८ ११३०.०१
एकूण : २२९९९ . ०३ १२६८०.२८