विदर्भ अन् महाराष्ट्रवादींमध्ये रंगले घोषणायुद्ध
By Admin | Updated: December 20, 2014 02:12 IST2014-12-20T02:12:04+5:302014-12-20T02:12:04+5:30
विदर्भावरील चर्चा सुरू असताना भाजपचे आशिष देशमुख यांनी विदर्भासाठी त्यांनी केलेल्या उपोषणाचा हवाला देत

विदर्भ अन् महाराष्ट्रवादींमध्ये रंगले घोषणायुद्ध
विदर्भावरील चर्चा सुरू असताना भाजपचे आशिष देशमुख यांनी विदर्भासाठी त्यांनी केलेल्या उपोषणाचा हवाला देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करून वेगळ्या विदर्भाची निर्मिती करावी, अशी मागणी जोरकसपणे केली. देशमुखांनी वेगळ्या विदर्भाचा नारा देताच सभागृहात कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, समीर मेघे, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, अनिल बोंडे आदी विदर्भवाद्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावर शिवसेनेचे आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी हा प्रस्ताव विदर्भाच्या विकासावर चर्चेसाठी असून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यासाठी नाही, असे मत नोंदविले. राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनीही मुंदडा यांना पाठबळ दिले. यामुळे विदर्भवादी आणखीणच भडकले. वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देऊ लागले. विदर्भवाद्यांच्या घोषणा सुरू असतानाच संयुक्त महाराष्ट्रवादी आमदारही घोषणा देऊ लागले. या घोषणायुद्धातच चर्चेची वेळ संपली. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्नोत्तरे घेण्यास सुरुवात केली असता भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांच्यासह भाजपचे बहुतांश आमदार जागेवरून उठले. खोपडे यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करून विदर्भावरील उर्वरित चर्चा पूर्ण करण्याची मागणी केली. गेल्या १० वर्षात विदर्भाचे ६० हजार कोटी रुपये दुसऱ्या क्षेत्रात वळविण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. डॉ. अनिल बोंडे म्हणाले, की विदर्भातील सिंचन प्रकल्पासाठी वितरित करण्यात आलेले २८०० कोटी रुपये खर्च झाले नसल्याचे सांगत अर्थसंकल्पातील ८५ टक्के निधी आता विदर्भावर खर्च करण्याची मागणी केली. चर्चेत सुधाकर देशमुख, शशिकांत खेडेकर आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)