विहिंप, बजरंग दलाची आदळआपट
By Admin | Updated: September 8, 2016 02:47 IST2016-09-08T02:47:48+5:302016-09-08T02:47:48+5:30
गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर कमानी व केलेली बॅनरबाजी याविरोधात मीरा-भार्इंदर पालिकेने धडक कारवाई सुरू केल्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा पापड मोडला आहे.

विहिंप, बजरंग दलाची आदळआपट
भार्इंदर : गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर कमानी व केलेली बॅनरबाजी याविरोधात मीरा-भार्इंदर पालिकेने धडक कारवाई सुरू केल्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा पापड मोडला आहे. युतीच्या सत्ताकाळात हिंदूंच्या सणानिमित्त लावलेल्या बॅनर, कमानींवर होत असलेल्या कारवाईविरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांसह भाजपा गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर गीता जैन यांची बुधवारी भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर बॅनर, रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या कमानींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हे बॅनर्स व कमानी यांचा थेट संबंध गणेशोत्सव मंडळांच्या निधी संकलनाशी असल्याने व त्यालाच फटका बसल्याने अनेक गणेश मंडळांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बॅनर व कमानी लावल्याने गणेश मंडळांना निधी मिळत असल्याने किमान उत्सवाच्या काळात तरी कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांकडे केली.
पालिकेच्या कारवाईला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. कारवाईचा जाब विचारण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे किशोर बन्सल, प्रेमचंद दुबे, गौरव सिंग, बजरंग दलाचे व भाजपा नगरसेवक डॉ. सुशील अग्रवाल, आशीष यादव, भाजपा सृष्टी मंडळाचे गजानन नागे, अशोक तोर,
शिवसेनेचे सूर्यकांत भोईर यांच्या शिष्टमंडळाने महापौर गीता जैन व आयुक्त डॉ. नरेश गीते यांची बुधवारी भेट घेतली.
या वेळी झालेल्या चर्चेत मुंबई व ठाणे मनपा हद्दीत गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात बॅनर्स व कमानी लावण्यात आल्या असून तेथील स्थानिक प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणले. मीरा-भार्इंदर मनपा मात्र परवानगी देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शहरात व राज्यात युतीची सत्ता असतानाही हिंदूंच्या सणात कारवाईचे विघ्न जाणीवपूर्वक आणले जात असल्याचा आरोप विहिंप व बजरंग दल यांनी केला.
महापौर जैन यांनी कायद्यावर बोट ठेवून मीरा-भार्इंदर पालिका न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करीत असून कारवाई सुरूच राहील, असे ठामपणे सांगितले. शिष्टमंडळाने दिलेले निवेदन पालिकेमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल, असे मोघम उत्तर आयुक्त डॉ. गीते यांनी दिले. (प्रतिनिधी)