भाज्यांनी गाठली शंभरी

By Admin | Updated: June 9, 2016 03:38 IST2016-06-09T03:38:12+5:302016-06-09T03:38:12+5:30

उन्हाळा लांबल्याचा परिणाम भाज्यांवर झाला असून पाण्याच्या कमतरतेमुळे बहुतांश भाज्यांनी शंभरी गाठली आहे.

Vegetables reached by hundredths | भाज्यांनी गाठली शंभरी

भाज्यांनी गाठली शंभरी


ठाणे : उन्हाळा लांबल्याचा परिणाम भाज्यांवर झाला असून पाण्याच्या कमतरतेमुळे बहुतांश भाज्यांनी शंभरी गाठली आहे. टोमॅटो, कारले, मिरची, कोथिंबीर, शेवग्याच्या शेंगा यांचे दर अव्वाच्यासव्वा वाढले आहेत. परिणामी, ग्राहकांची मागणी असली तरी खरेदीचे प्रमाण मात्र चांगलेच घटले असल्याची चिंता भाजीविक्रेत्यांनी व्यक्त केली.
पाण्याचा भीषण दुष्काळ आणि अद्याप पावसाची चिन्हे नसल्याने भाज्या चांगल्याच कडाडल्या आहे. एरव्ही, ४० ते ६० रुपये किलो दराने मिळणाऱ्या भाज्यांनी शंभरीचा पल्ला गाठला आहे, तर अनेकांनी शंभरीदेखील ओलांडली आहे. दुधी, कोबी आणि लालभोपळा या भाज्या सोडल्या, तर बाकी सर्वच भाज्यांना महागाईची झळ पोहोचली आहे. त्यामुळे एक किलो भाजी घेणारा ग्राहक आता पाव किलो खरेदी करू लागला आहे. वाढत्या दरामुळे ग्राहक भाजी खरेदी करताना हात आखडता घेत असल्याने भाज्यांची आवकही घटून ५० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे मोजकाच माल आणण्यावर आमचा भर असतो, असे भाजीविक्रेते विवेक भुजबळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कोथिंबिरीचा दर चौपट वाढला आहे. १० ते १५ रुपयांना मिळणारी जुडी आता ६० रुपयांना विकली जात आहे. (प्रतिनिधी)
>फळभाज्यांबरोबर पालेभाज्यांचेही दर वधारले आहेत. मेथी सर्वाधिक महागडी झाली आहे. पाण्याअभावी दर कडाडले आहेत. - जयवंत चिपाडे, पालेभाजीविक्रेते
>भाज्यांचे वाढलेले दर पाहता ग्राहक भाज्यांची खरेदी करतील की नाही, याबाबत शंकाच असते. त्यामुळे आम्ही मोजकाच माल आणतो. लागलीच भाज्यांचे दर कमी होणार नाही.
- विवेक भुजबळ,
गावदेवी मार्केट

Web Title: Vegetables reached by hundredths