लग्नसराईमुळे वाढतेय भाज्यांची मागणी!
By Admin | Updated: May 10, 2017 00:11 IST2017-05-10T00:11:12+5:302017-05-10T00:11:12+5:30
सध्या भाजीबाजारात किरकोळ ग्राहकांकडून फारसा उठाव असली; तरी लग्नसराईमुळे फरसबी, फ्लॉवर, टोमॅटो, काकडी, गाजर

लग्नसराईमुळे वाढतेय भाज्यांची मागणी!
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सध्या भाजीबाजारात किरकोळ ग्राहकांकडून फारसा उठाव असली; तरी लग्नसराईमुळे फरसबी, फ्लॉवर, टोमॅटो, काकडी, गाजर, सिमला मिरची या भाज्यांना मात्र चांगलीच मागणी आहे. फरसबीचे दर अव्वाच्या सव्वा असल्याने या भाजीकडे तर सामान्य ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. पण कॅटरर्सकडून मात्र तिची मागणी वाढती असल्याचे ठाण्यातील भाजीविक्रेत्यांनी सांगितले.
सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर पन्नाशीच्या पुढेच आहेत. वाटाणा, गवार, शेवग्याच्या शेंगा तर ८० आणि १०० घरात पोचल्या आहेत. पण या सर्व भाज्यांमध्ये सध्या भाव खात आहे, ती म्हणजे फरसबी. आधी फरसबी ६० रुपये किलोने विकली जात होती. परंतु उत्पादन घटल्याने आणि त्याचवेळी लग्नसराईमुळे मागणी झपाट्याने वाढत गेल्याने या भाजीने सध्या दरामध्ये द्विशतकाचा उंबरठा गाठला आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक फरसबीच्या खरेदीकडे वळत नसल्याचे भाजी विक्रेते संदीप भुजबळ यांनी सांगितले. लग्नसराईत वेगवेगळ््या भाज्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
यंदा फरसबीसोबतच फ्लॉवर, टोमॅटो, काकडी, गाजर, सिमला मिरची या भाज्यांना मागणी आहे. या भाज्यांचे दर सर्व सामान्यांना परवडणारे नसल्याने या भाज्यांनी खरेदी सामान्य ग्राहक फारशी करत नाही. परंतु त्यांना कॅटरर्स आणि हॉटेलवाल्यांकडून मात्र मागणी असल्याचे भाजीविक्रेते भगवान तुपे यांनी सांगितले.
भाज्यांची नावेदर -
फरसबी २००
फ्लॉवर ६०
कोबी ६०
वाटाणा १००
टोमॅटो ३०
सिमला मिरची ६०
गवार ८०
शेवग्याच्या शेंगा १२०
कारले ८०
भेंडी ६०
तोंडली ६०
वांगे ६०
शिराळी ८०
दूधी ५० ते ६०
मिरच्या १२०
गाजर ६०
काकडी ४०
बीट ६०