वसई-विरारला पावसाने झोडपले
By Admin | Updated: July 2, 2016 03:27 IST2016-07-02T03:27:10+5:302016-07-02T03:27:10+5:30
रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने वसईला अक्षरश: झोडपून काढले.

वसई-विरारला पावसाने झोडपले
वसई : रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने वसईला अक्षरश: झोडपून काढले. नालासोपारा शहरात ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर नवघर पूर्वेकडील मीठागर पाड्याला पाण्याने चारीबाजूने वेढल्याने तेथील संपर्क तुटला होता. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने लोकांना दिलासा मिळाला.
रात्री धो-धो कोसळत असलेल्या पावसाने वसईतील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत केले होते. पावसाचा मोठा फटका नालासोपारा शहराला बसला. शहरातील रेल्वे उड्डाणपूलाखालून तीनही ठिकाणी जाणारे मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले. मुख्य रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याचबरोबर आचोळे, तुळींज आदी परिसरातही पाणी तुंबून राहिले होते. तर सोपारा गाव ते देसाई वाडी दरम्यान पाणी तुंबल्याने तेथील लोकांचे हाल झाले होते. वसई रोड येथील नवघर पूर्वेकडे असलेल्या मीठागर पाड्या शेजारील खाडीला पूर आल्याने येथील लोकांचा संपर्क तुटला होता. कमरेइतके पाणी साचून राहिल्याने दीडशे कुटुंबे अडकून पडली होती. पूर ओसरला नाही आणि पावसाचा जोर कायम राहिल्यास येथील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. वसई रोड रेल्वे स्टेशनलगत पश्चिमेकडील नवघर एसटी स्टँडमध्ये आज गुडघाभर पाणी साचून राहिल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. वसई पश्चिमेकडील काही गावांमध्येही पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने लोकांना दिलासा मिळाला.
>इमारतीचा
पाया कोसळला
विरार : सतत पहणाऱ्या मुसळधार पावसाने विरार मध्ये न्यू मोरेश्वर नगर या चार मजली इमारतीचा पाया कोसळला. विरार पूर्व फुलपाडा रोड न्यू मोरेश्वर नगर येथे २० फूट खोल नाल्यावरच ही अनाधिकृत इमारत बांधण्यात आली आहे. नाल्याच्या बाजूचा पाया आणि संरक्षण भिंत कोसळल्याने येथील २९ कुटुंबे संकटात सापडली आहेत.
>पूरस्थितीमुळे
भातरोपे वाया
पारोळ/वसई : वसई पूर्व भागात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने तानसा, तुंबाडी या नद्या व जंगलातील नाले भरून वाहू लागल्याने जमीन पाण्याखाली जाऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नवजात भातरोप पायाखाली गेल्याने वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट वसई पूर्व भागातील शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे.
>केळीच्या झाडांचे नुकसान
वसई : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने वसई तालुक्यातील पश्चिम पट्टङ्मातील बागायती क्षेत्राचे मोठे नुकसान केले. येथील केळीच्या अनेक बागा उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
वसई तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी तीन हजार ५०० हेक्टर बागायती शेतीचे क्षेत्र आहे. गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे केळीच्या बागा या काही प्रमाणावर उद्वस्त झाल्या आहेत. वसईची पश्चिम किनार पट्टी नारळ, केळीच्या बागांसाठी प्रसिध्द आहे.
बनकेळी, वेलची केळी, भूर केळी अशा विविध प्रकारच्या केळींची लागवड पश्चिम किनारपट्टीवर होते. परंतु गेल्या काही दिवसापासून पडलेल्या पावसामुळे खोचीवडे, भुईगाव, रानगाव, कळंब, राजोडी, निर्मळ या ठिकाणच्या केळी आडव्या झाल्या आहेत. त्यामुुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.