भांडणामुळे शिवसेना-भाजपात अस्वस्थता
By Admin | Updated: June 30, 2016 04:29 IST2016-06-30T04:29:04+5:302016-06-30T04:29:04+5:30
शिवसेना-भाजपाचे भांडण आरोप-प्रत्यारोपापुरते मर्यादित न राहता ते रस्त्यावर एकमेकांच्या प्रतिमांची जाळपोळ करण्यापर्यंत गेले आहे.

भांडणामुळे शिवसेना-भाजपात अस्वस्थता
अतुल कुलकर्णी,
मुंबई- शिवसेना-भाजपाचे भांडण आरोप-प्रत्यारोपापुरते मर्यादित न राहता ते रस्त्यावर एकमेकांच्या प्रतिमांची जाळपोळ करण्यापर्यंत गेले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत अस्वस्थता आहे. भाजपाच्या ‘मनोगत’ पाक्षिकात प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना शोले चित्रपटात अभिनेते असरानी यांनी साकारलेल्या जेलरशी केल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी सदर मासिकाचे अंक जाळले होते. तर मंगळवारी चर्चगेट परिसरात अमित शहा यांच्या पोस्टरवर ‘हुकूमशहा गब्बरसिंह’, माधव भांडारी यांच्या पोस्टरवर ‘हुकूमशहाचा सांबा’ आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पोस्टरवर ‘शकुनी मामा’ असे छापून ते पोस्टर्स फडकविण्यात आले. यावर शेलार यांना विचारले असता त्यांनी ‘नो कॉमेंट’ अशी प्रतिक्रिया देत यावर काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र शिवसेनेच्या मुखपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने आमचा प्रश्न मिटल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी एका बैठकीत पार्टी ‘निर्दयता’ से चलानी चाहिये, असे विधान तीन-चार वेळा केले. त्यावर एका नेत्याने ‘निर्भयता से की निर्दयता से’ असा प्रतिसवाल केला; तेव्हा म्हणे शहांनी ‘निर्दयता से’ असे जोर देऊन सांगितले. त्यावरून भविष्यात भाजपा शिवसेनेसोबत कशा पद्धतीने वागेल याची चुणूक दिसेलच, असेही तो नेता म्हणाला.
शिवसेनेच्या ५० व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने युती झाली तरच आम्ही युती करू अन्यथा वेगळे लढण्याची तयारी ठेवा, असे सांगून ठाकरेंनी पक्षातून बाहेर पडणाऱ्यांपुढे गाजर धरण्याचा प्रयत्न केल्याचे मत भाजपाच्या अत्यंत ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. महापालिका निवडणुकीत जे लोक भाजपातर्फे तिकीट मागण्यासाठी उत्सुक आहेत ते शिवसेना सोडून जाऊ नयेत यासाठी उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक केलेली ही खेळी असल्याचेही सांगितले जात आहे. शिवाय दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे मराठी मते शिवसेनेच्या बाजूने तर अन्य मते भाजपाच्या बाजूने वळतील आणि दोघांच्याही जागा वाढतील, असा सूरही यामागे लावला जात आहे. मात्र या दोघांच्या भांडणांचा परिणाम राज्यातल्या उद्योग, व्यापारावर होत असल्याचे मत मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.