Shiv Sena Shinde Group Uday Samant News: मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होते, मी तेव्हा बोललो. मी आजही बोलेन. उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवे. कार्यकर्ते कमी होत आहे, म्हणून निवृत्ती घ्यायचे काहीच कारण नाही. ३९ जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे. शेवटी आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असे वाटते की, आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळे कारण नाही, असे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले होते. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्याच एका नेत्याने भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद होईल, असे म्हटले आहे.
भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्याने निवृत्तीचा विचार करणे योग्य नाही, अशी माझी भावना आहे. माझे हे वक्तव्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा टोमणा नाही. ही माझी खरी भावना आहे. भास्कर जाधव यांनी अनेकदा माझ्यावर टीका केली आहे. माझ्याबद्दल बोलताना मातोश्रीवरचा राग काढला आहे. मी जवळचा माणूस असल्यामुळे त्यांचे ऐकून घेतो. म्हणूनच माझ्यावर राग काढतात. मात्र, ते जे काही बोलले त्या मातोश्रीच्या भावना होत्या. भास्कर जाधव हे मातोश्रीवर प्रचंड नाराज असल्याचे माध्यमातूनच समजले. मी ही त्यावर खुल्या मनाने सांगतो की, भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले तर आम्हाला आनंद होईल, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव आले होते
एकनाथ शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते, ते सुरतच्या बॉर्डरपर्यंत जाऊन आले. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, तुम्ही येऊ नका, असा दावा करतानाच भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे येऊन चूक केली असे ते म्हणतात. गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे, ते फक्त १२०० मतांनी निवडून आलेले आहेत, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, भास्कर जाधव जे बोलले तेवढा तो मोठा माणूस नाही. १९९५ आणि २००० मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितले होते. नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही. भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचे हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावे, अशी टीका रामदास कदम यांनी केली.