खंडणीसाठी राज्यात दोन हत्या

By Admin | Updated: March 1, 2017 06:29 IST2017-03-01T06:29:03+5:302017-03-01T06:29:03+5:30

एका बालकाचा सोमवारी रात्री खून केल्याची धक्कादायक घटना खंडणीखोराने दिलेल्या चिठ्ठीमुळेच उघडकीस आली

Two murders in state for ransom | खंडणीसाठी राज्यात दोन हत्या

खंडणीसाठी राज्यात दोन हत्या


औरंगाबाद : पाच कोटींसाठी अपहरण करून एका बालकाचा सोमवारी रात्री खून केल्याची धक्कादायक घटना खंडणीखोराने दिलेल्या चिठ्ठीमुळेच उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
वर्धन विवेक घोडे (१०) (रा. गुरुकुंज हौसिंग सोसायटी, टिळकनगर) याचे अभिलाष सुधीर मोहनपूरकर (२४) आणि श्याम लक्ष्मण मगरे (२०) यांनी सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान कारमधून अपहरण केले. त्यांनी वर्धनच्या घरात ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारी चिठ्ठी टाकली. आरोपींनी वर्धनला कारमधून खुलताबाद परिसरात नेले व बराच वेळ फिरवले. रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान त्याचा गळा व तोंड दाबून खून केला. त्याचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकून ते परत औरंगाबादकडे निघाले. वर्धनचा मृतदेह त्यांनी श्रेयनगर नाल्यात फेकून दिला; परंतु ते घाबरलेले असल्यामुळे त्यांची कार रस्त्यालगतच्या खांबाला धडकली. त्याचवेळी पोलीस तेथे आले. त्यांनी आरोपींना ओळखले व ताब्यात घेतले. अभिलाषला वर्धनविषयी विचारले असता, त्याने सांगितले की, एक तासापूर्वीच वर्धन घरी जातो म्हणून निघून गेला आहे. त्यानंतर कुठे गेला माहीत नाही.
रूमालाने गळा आवळून मारले
भारती विवेक घोडे (३८) यांचे पती विवेक हे बिल्डर होते, सुमारे सहा वर्षांपूर्वी कळवा (ठाणे) येथे मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांचा खून झाला होता. औरंगादला त्यांच्या कॉलनीतच राहणाऱ्या अभिलाष याने झटपट पैसा कमविण्यासाठी आपल्या वर्गमित्राचा भाऊ श्याम यास मुंबईहून बोलावून घेतले. त्याला सुरक्षारक्षक म्हणून कामावर ठेवून घेतले. आरोपींनी वर्धनसोबत अधिक ओळख वाढविली व त्यास ते उघड्या स्पोर्ट कारमधून फिरवू लागले. वर्धनचे अपहरण करून शरणापूर शिवारात नेऊन त्याचा गाडीत रूमालाने गळा आवळून खून केला.
दादा मला नका मारू
वर्धन हा लिटल वूड शाळेचा उत्तम खेळाडू विद्यार्थी होता. अनेक पुरस्कार त्याला मिळाले होते. मजबूत बांध्याचा असल्याने दोघाही आरोपीला त्यांच्या ताकदीचा वापर करावा लागला. सुरुवातीला त्याच्या गळ्यात रुमाल टाकून फास आवळण्याचा प्रयत्न आरोपीने केला तेव्हा वर्धन म्हणाला दादा मला नका मारू. मी दादा म्हणतो तुम्हाला...परंतु आरोपींनी त्याचा जीव गेल्यानंतरच दम सोडला.

Web Title: Two murders in state for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.