दोन महिन्यांनंतरही दुहेरी खुनाचा लागेना छडा
By Admin | Updated: June 5, 2017 00:42 IST2017-06-05T00:42:17+5:302017-06-05T00:42:17+5:30
महाराष्ट्र हादरवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन युवक, युवती यांच्या दुहेरी खून प्रकरणाला शनिवारी दोन महिने पूर्ण झाले.

दोन महिन्यांनंतरही दुहेरी खुनाचा लागेना छडा
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : महाराष्ट्र हादरवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन युवक, युवती यांच्या दुहेरी खून प्रकरणाला शनिवारी दोन महिने पूर्ण झाले. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नसल्याने मृत युवक व युवतीच्या नातेवाइकांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली आहे.
मागील महिन्यात या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले होती. मात्र, एसआयटीच्या तपास पथकालाही प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आलेले नाही.
२ एप्रिल रोजी रात्री लोणावळा आयएनएस शिवाजी समोरील एस पॉइंट डोंगरावर सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकणारा अहमदनगर जिल्ह्यातील सार्थक वाकचौरे व पुणे जिल्ह्यातील श्रुती डुंबरे या विद्यार्थी व विद्यार्थिंनीचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यांच्या अंगातील कपडे काढून दगडाने व अज्ञात हत्याराने डोक्यात व शरीरावर वार करण्यात आले होते. ३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा हादरून गेले होते.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील १४ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या आठ तपास पथकांनी घटनास्थळ व परिसर पिंजून काढला. वेगवेगळ्या शक्यता पडताळताना जवळपास दीड लाख फोन कॉल्स, मयतांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित अशा जवळपास दोन हजारांहून अधिक जणांची चौकशी केली. हा खून नेमका कोणी व कोणत्या कारणांसाठी केला असावा याचा मागोवा घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
या प्रकरणाला एक महिना उलटल्यानंतरही तपास यंत्रणांना अपयश आल्याने मृत सार्थकच्या आईने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत २० मे रोजी आत्मदहन करण्याचा तर नातेवाइकांनी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा २ मे रोजी लोणावळा पोलिसांना निवेदनाद्वारे दिला होता. त्यानंतर तातडीने पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक केली. आरोपींची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवत ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यालाही महिना उलटला. मात्र, गेल्या दोन महिन्यांत तपासात प्रगती झाली नसल्याने याप्रकरणी पोलिसांचे हात रिक्तच राहिले आहेत.