अकोला जिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या
By Admin | Updated: August 2, 2016 00:16 IST2016-08-02T00:16:10+5:302016-08-02T00:16:10+5:30
सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.

अकोला जिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या
तेल्हारा (जि.अकोला) : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून दोन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना १ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्या.
तेल्हारा येथील साईनगर येथे राहणारे लक्ष्मण भानुदास वावळे (५२) यांच्याकडे दोन एकर शेती होती. गेल्या काही वर्षापासून होणारी नापिकी व डोक्यावरील कर्जाला कंटाळून त्यांनी १ ऑगस्ट रोजी पहाटे घोडेगाव रस्त्यावरील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. यासंदर्भात मनोज सातपुते यांनी तेल्हारा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून पुढील तपास सुरु आहे.
आत्महत्येची दुसरी घटना मनब्दा येथे घडली. रामराव नारायण चांदूरकर (५५) या शेतकर्याने १ ऑगस्ट रोजी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात विलास चांदूरकर यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. तेल्हाराचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी घटनास्थळावर जाऊन चौकशी केली. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यांत १५ शेतकर्यांनी सततची नापिकी व पीक कर्जाच्या थकबाकीस कंटाळून आत्महत्या केली आहे.