उद्यान, तरण तलावांचे पाणी बंद
By Admin | Updated: July 17, 2014 02:33 IST2014-07-17T02:33:15+5:302014-07-17T02:33:15+5:30
अपु-या पावसामुळे तलावातील पातळी खालवत असल्याने पालिकेने २ जुलैपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली आहे़

उद्यान, तरण तलावांचे पाणी बंद
मुंबई : कोणतेही पर्यायी जलस्त्रोत विकसित न करता पाणीकपात वाढविण्यावरच भर देणाऱ्या प्रशासनाला विरोधी पक्षाने धारेवर धरताच तरण तलाव, उद्यान, शीतपेय, बाटलीबंद पाणी पुरविणाऱ्या कंपन्या आणि बांधकामांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय पालिकेने आज घेतला़ त्याचबरोबर मॉल्स, पंचतारांकित हॉटेल्स, कारखाने अशा व्यापारी क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात उद्यापासून थेट ५० टक्के कपात होणार आहे़
अपुऱ्या पावसामुळे तलावातील पातळी खालवत असल्याने पालिकेने २ जुलैपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली आहे़ ही कपात आणखी दहा टक्क्यांनी वाढविण्यात येणार होती़ परंतु यावर विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेत व्यावसायिक ग्राहकांवर पालिका मेहेरबान का, असा जाब विचारला होता़ यामुळे अडचणीत आलेल्या प्रशासनाने तूर्तास पाणीकपात न वाढविता पाण्याचा अपव्यय टाळण्याकडे भर दिला आहे़
त्यानुसार मुंबईतील तरणत लावांचा पाणीपुरवठा उद्यापासून बंद करण्यात येणार आहे़ तसेच मॉल्स, तारांकित हॉटेल्स, कारखाने यांची २० टक्के पाणीकपात ५० टक्क्यांवर नेण्यात येणार आहे़ त्याचबरोबर शीतपेय आणि बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्या आणि बांधकामांच्या ठिकाणी केवळ तेथील कामगारांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे, तर उद्यान व शौचालयाचे पाणीही बंद करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)