‘इंद्रायणी’चे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: September 20, 2016 02:11 IST2016-09-20T02:11:29+5:302016-09-20T02:11:29+5:30

प्रशासन एखाद्या गोष्टीमागे ठामपणे उभे राहिल्यानंतर काय घडू शकते, याचा प्रत्यय सध्या आळंदीकर ग्रामस्थांना येत आहे.

Trying to stop the pollution of 'Indrayani' | ‘इंद्रायणी’चे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न

‘इंद्रायणी’चे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न


आळंदी : प्रशासन एखाद्या गोष्टीमागे ठामपणे उभे राहिल्यानंतर काय घडू शकते, याचा प्रत्यय सध्या आळंदीकर ग्रामस्थांना येत आहे. केवळ दुसऱ्यावर बोट उचलत बसण्यापेक्षा आपणही झालेल्या दुरवस्थेस कुठेतरी जबाबदार आहोत आणि ती दुरवस्था दूर करण्यासाठी आपलेही कार्य विधायक हवे, या विचाराने प्रेरित होत येथील नगर परिषद प्रशासनाने यंदा इंद्रायणीत मूर्ती विसर्जित न करू देता नदीचे होणारे प्रदूषण रोखण्याचा उपक्रम आखला.
इंद्रायणी प्रदूषित होण्यामागे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच जबाबदार आहे. त्याबाबत ठोस भूमिका घेणाऱ्या आळंदी पालिकेने आपल्या भागात होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालायचा, असा चंगच बांधला आणि त्याचा श्रीगणेशा साक्षात गणरायाच्या मूर्ती इंद्रायणीच्या पाण्यात विघटित होऊ न देण्यापासूनच केला. त्यांचा हा उपक्रम विधायक ठरत असून, क वर्ग दर्जातील पालिकांमध्ये उल्लेखनीय ठरत आहे. याचे सर्वस्वी श्रेय अवघ्या सहा महिन्यांपासून येथील मुख्याधिकारी पदावर रुजू झालेले डॉ. संतोष टेंगले, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर व इतर लोकप्रतिनिधींचे आहे.
पालिकेने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविण्याचे आवाहन केले होते. इंद्रायणी नदीकाठी कृत्रिम तलावही उभारण्यात आला होता. परंतु तलाव व हौद उभारत हात वर करून आपली नैतिक जबाबदारी न झटकता तो उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात पालिकेचे कार्य खरे कौतुकास्पद आहे. इंद्रायणी नदीघाटावर दगडी बांधकाम आहे. अंदाजे चारशे-पाचशे मीटरचा हा घाट आहे. येथील परिसरातील सर्वाधिक मूर्ती याच घाट परिसरात विसर्जित केल्या जातात. पालिकेच्या वतीने येथे विसर्जनाच्या वेळी स्वयंसेवक नेमण्यात आले होते. हे स्वयंसेवक भाविकांना मूर्ती तलावात विसर्जित करण्याचे आवाहन करत होते. परंतु काही भाविक त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता मूर्ती नदीत विसर्जित करत होते. भाविकांनी मूर्ती विसर्जित केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी स्वयंसेवक स्वत: पाण्यात उतरून ती मूर्ती पाण्यातून बाहेर काढत होते. (वार्ताहर)
तुम्ही तुमची श्रद्धा जपा : आम्ही आमचे कर्तव्य जपतो
विसर्जनाच्या वेळी स्वयंसेवक नेमण्यात आले होते. हे स्वयंसेवक भाविकांना मूर्ती तलावात विसर्जित करण्याचे आवाहन करत होते. परंतु काही भाविक त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता मूर्ती नदीत विसर्जित करत होते.
भाविकांनी मूर्ती विसर्जित केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी स्वयंसेवक स्वत: पाण्यात उतरून ती मूर्ती पाण्यातून बाहेर काढत होते. वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याची श्रद्धाही जपली जात होती.
इंद्रायणी नदीघाटाच्या दोन्ही बाजूस शंभरच्या आसपास स्वयंसेवक नेमण्यात आले होते. यात पालिकेचे कर्मचारी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व माईर्स एमआयटीचे विद्यार्थी, पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते, आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व इतर सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
या मोहिमेत सहभागी झालेल्या पोलीस मित्र व विद्यार्थ्यांना पांडुरंग वाहिले यांच्याकडून पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे या पांढऱ्या रंगाच्या पोषाखात या मोहिमेला शिस्तबद्धता आली होती. या सर्वांमार्फत सातव्या व अकराव्या दिवशी मूर्ती पाण्याबाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत आठ ते नऊ हजार मूर्ती पाण्याबाहेर काढण्यात आल्या. या सर्व मूर्ती आपल्या ताब्यात घेत पालिकेने त्यांचे कृत्रिम विघटन केले. त्यांचा हा उपक्रम प्रभावी ठरला असून, यंदाच्या गणेशोत्सवात इंद्रायणीच्या प्रदूषणास मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात यश आले आहे.

Web Title: Trying to stop the pollution of 'Indrayani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.