तृप्ती तुपे खून खटला जलदगती न्यायालयात चालणार
By Admin | Updated: September 10, 2014 02:57 IST2014-09-10T02:57:43+5:302014-09-10T02:57:43+5:30
पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती तुपे हिचा अत्याचार करून खून केल्याचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

तृप्ती तुपे खून खटला जलदगती न्यायालयात चालणार
पारनेर (जि.अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती तुपे हिचा अत्याचार करून खून केल्याचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याशी त्यासंदर्भात बोलणे झाल्यानंतर त्याला गती मिळाली. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून खटला घेण्यास संमती दिल्याची माहिती मिळाली आहे.
तालुक्यातील अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती तुपे ही लोणी मावळाला तिच्या घरी जात असताना तीन नराधमांनी तिचा खून केल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. गावातीलच संतोष लोणकर, सुनील लोणकर व विहिरीचे खोदकाम करणारा दत्ता शिंदे यांनी तृप्तीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. राज्य सरकारने प्रकरणात लक्ष घालावे यासाठी पारनेर तहसील कार्यालयावर अण्णा हजारे यांनी मोर्चा काढून घटनेचा निषेध केला होता. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र पाठवून प्रकरण जलदगती न्यायालयात पाठविण्याची मागणी केली होती. त्यानंतर अण्णांनी रविवारी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांशी चर्चा केली. (प्रतिनिधी)