कऱ्हाड-चिपळूण रेल्वेसाठी प्रयत्न
By Admin | Updated: January 28, 2015 00:55 IST2015-01-27T21:29:32+5:302015-01-28T00:55:34+5:30
उदयनराजे : जिल्हा विकास समितीत ठराव पारित करण्याचे आवाहन

कऱ्हाड-चिपळूण रेल्वेसाठी प्रयत्न
सातारा : कोकण भुमी पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी कऱ्हाड-चिपळूण हा सुमारे १११ किलोमीटर लांबीचा रेल्वे लोहमार्ग रास्त आणि व्यावहारिकदृष्टया योग्य असून, राज्य शासनाने या मार्गाच्या एकूण ९२० कोटी खर्चापैकी पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे कऱ्हाड-चिपळूण या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराव पारीत करावा, याबाबत योग्य पाठपुरावा करु असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोकणातुन पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार आणि एकंदरीत विकासासाठी कोकण भुमी पश्चिम महाराष्ट्राला लोहमार्गाने जोडण्याची नितांत आवश्यकता ओळखुन, सातारा जिल्ह्याातील कऱ्हाड आणि रत्नागिरी जिल्हातील चिपळूण या दोन मध्यम-मोठया शहरांना जोडणारा लोहमार्ग प्रस्तावित करावा अशी मागणी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले.
सर्वेक्षणात एकूण १११ किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाची आखणी करण्यात आली आहे. तसेच कोकण भूमी अन्य ठिकाणाहून महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्याची झाल्यास ते सह्याद्री डोंगररांगांच्या अवघड रचनेचा विचार करता कऱ्हाड-चिपळून हाच मार्ग सोयीस्कर ठरणार आहे. (प्रतिनिधी)
शासनाची सकारात्मक भूमिका
राज्य सरकारने कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्गाच्या एकूण खर्चाचा पन्नास टक्के वाटा उचलण्याचे मान्य करुन याबाबतचा प्रस्ताव सन २०१० मध्ये रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी सातारा जिल्हा नियोजन आणि विकास समितीमध्ये ठराव पारित करण्यात यावा असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.