व्यापारी-फेरीवाले संघर्ष पेटला

By Admin | Updated: October 18, 2016 03:33 IST2016-10-18T03:33:58+5:302016-10-18T03:33:58+5:30

रस्त्यांवर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची मुजोरी वाढत असून त्यातूनच सोमवारी स्टेशन परिसरात व्यापारी-फेरीवाल्यांत संघर्ष झडला.

The trade-stricken conflict erupted | व्यापारी-फेरीवाले संघर्ष पेटला

व्यापारी-फेरीवाले संघर्ष पेटला


ठाणे : रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली एकीकडे दुकाने तोडली जात असताना त्याच रस्त्यांवर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची मुजोरी वाढत असून त्यातूनच सोमवारी स्टेशन परिसरात व्यापारी-फेरीवाल्यांत संघर्ष झडला. बेकायदा फेरीवाल्याने दुकानदाराला धमकी दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच आक्रमक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत पोलीस आणि पालिका प्रशासनाचा निषेध केला. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होताच त्यांनीही प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढला. फेरीवाल्यांवर कारावईसाठी व्यापाऱ्यांनी पालिकेला अवघ्या दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्याला फेरीवाल्यांनी विरोध केला आहे. परिणामी, ऐन दिवाळीच्या तोंडावर, खरेदीच्या मोसमात व्यापाऱ्यांमधील खदखद यानिमित्ताने बाहेर आली.
ठाण्याच्या बाजारपेठेत दुकानाबाहेर फेरीवाल्याने परस्पर ठेला मांडला. दुकानदाराने आक्षेप घेत त्याला हटकले. त्यातून झालेल्या वादातून फेरीवाल्याने या दुकानदाराला धमकावले. बाजारपेठेत हे वृत्त झपाट्याने पसरले आणि व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली.
फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याने व्यापारी नाराज आहेत. त्यातच थेट दुकानाबाहेर ठेला मांडून दुकानात येण्याचा रस्ता बंद करणाऱ्या फेरीवाल्याला हटकताच दुकानदाराला धमकावण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आक्रमक होत बाजारपेठेतील सर्वच फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी लावून धरली. महापालिकेच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. त्यामुळे बाजारपेठेत फेरीवाला विरुद्ध व्यापारी असा संघर्ष उभा ठाकला. महापौर संजय मोरे, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी घटनास्थळी जाऊन सर्वांची समजूत काढली. त्यावेळी व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांवर कारवाईसाठी महापालिकेला दोन दिवसांचा अवधी दिला, तर फेरीवाल्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीची मागणी केली. महापौर आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने उघडली. त्यानंतर फेरीवाले आक्रमक झाले आणि त्यांनी नौपाडा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढला.
रूंद रस्त्यांचा वाहतूक सुरळीत होण्यास उपयोग होत नाही. उलट फेरीवाले त्या जागेचा बेकायदा ताबा घेतात. त्यांना राजकीय संरक्षण मिळते. पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांचा धंदा सुरू राहतो. मात्र दुकानदार भरडले जातात. त्यामुळे ठाण्यातीलच नव्हे, तर कल्याण आणि डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी रस्ता रूंदीकरणाविरोधात आवाज उठवला.
>फेरीवाला धोरण वादात; सेनेचीही कोंडी
केवळ ठाणेच नव्हे, तर कल्याण-डोंबिवलीतही व्यापारी-फेरीवाले संघर्ष सुरू आहे. त्यात मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेत पालिकेला लक्ष्य केल्याने भाजपाची कोंडी झाली होती. ठाण्यातही रस्ता रूंदीकरणात दुकाने तोडण्याची कारवाई पूर्ण झाल्यावर भाजपाने व्यापाऱ्यांची बाजू उचलून धरली. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली होती. व्यापाऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे पावसाळ््यानंतर सुरू होणारा ठाणे पालिकेचा रस्ता रूंदीकरणाचा पुढील टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे, तर डोंबिवलीतील रस्ता रूंदीकरण वादात सापडले आहे. पालिका व्यापाऱ्यांना वेठीला धरते, मात्र फेरीवाल्यांना झुकते माप देते असा व्यापाऱ्यांचा आक्षेप आहे; तर फेरीवाला झोन ठरवण्यात व्यापारी खोडा घालतात, असा फेरीवाल्यांचा आरोप आहे.

Web Title: The trade-stricken conflict erupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.