सवंग लोकप्रियतेसाठी टोलमाफीचा निर्णय
By Admin | Updated: April 12, 2015 01:33 IST2015-04-12T01:33:54+5:302015-04-12T01:33:54+5:30
राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घेतला आहे.अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.
सवंग लोकप्रियतेसाठी टोलमाफीचा निर्णय
नाशिक : राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घेतला आहे. त्यातून लोकांना काही फायदा होईल, असे दिसत नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.
परदेशात चांगले रस्ते असून त्यासाठी टोल आकारण्यात येतो. मात्र, टोल आकारायचा नाही आणि दुसरीकडे बांधकाम खात्याला रस्ते दुरुस्तीसाठी जादाचा निधीही द्यायचा नाही, असे कसे चालेल. वाहनांना टोलमाफी मिळाल्याने रस्ते खड्डेमय होतील, त्यामुळे वेळ आणि इंधन जादा लागेल. खराब रस्त्यांमुळे शारीरिक आजारही जडतील, असे त्यांनी सांगितले.
सर्वात कमी कालावधीत सर्वाधिक विदेशी दौरे करण्याचा विक्रम करणाऱ्या पंतप्रधानांनी परदेशात करार करताना शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवावेत. सध्याच्या सरकारचे शेतकरी आणि शेतीकडे साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
नैसर्गिक आपत्तीसाठीच्या समितीचा मी गेल्या दहा वर्षांपासून अध्यक्ष होतो. मात्र सध्याच्या समितीच्या बैठकीत नुकसानभरपाईसाठी काही मदत देण्याचा निर्णय झाल्याचे मला अद्याप समजलेले नाही. येत्या अधिवेशनात या प्रश्नावर सरकारशी भांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील मुस्लीम समाज सर्व स्तरातील घटकांशी जुळवून घेत असून, पुरोगामी महाराष्ट्रात एमआयएम सारख्या पक्षांना थारा मिळणार नाही, असे पवार म्हणाले.
चितळे समिती आणि अय्यंगार समितीच्या शिफारशीनुसार आधी दाखविण्यात आलेल्या पाण्याचे लाभक्षेत्र आताचे सरकार
कमी दाखवित आहे. मात्र पाण्यावरील हक्क आम्ही अजिबात सोडणार
नाही, अशी आग्रही भूमिका
छगन भुजबळ यांनी मांडली. (प्रतिनिधी).
च्महाराष्ट्र मराठी भाषिक राहण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्याच महाराष्ट्रात वेगळ्या विदर्भाची भाषा करणे चुकीचे आहे. शेवटी वेगळे राज्य करण्याचा निर्णय नेत्यांनी नव्हे, तर जनतेने घेतला पाहिजे. गोवा राज्य वेगळे करताना जनतेचे मतदान घेतले होते.
च्गेल्या काही वर्षांचा विदर्भातील जनतेच्या निवडणुकांमधील कौल पाहता ते वेगळ्या विदर्भाच्या विरोधात असल्याचे आढळून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस वेगळ्या विदर्भाला पाठिंबा देणार नाही. वेगळ्या विदर्भासाठी जनतेनेच निर्णय घ्यायचा असल्याचे पवार यांनी सांगितले.
हेरगिरी नव्हे
पंडित नेहरूंच्या काळात सुभाषचंद्र बोस यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे आताचे सरकार बोलत आहे. मात्र मी गृहमंत्री असताना माझ्यावरही पाळत ठेवण्यात येत होती. सार्वजनिक जीवनातील व्यक्ती व कुटुंबीयांच्या हितासाठी व संरक्षणासाठीच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येते. त्यात काहीही गैर नाही, असे काही नाही. त्यामुळे ही हेरगिरी नव्हे जबाबदारी असल्याचे पवारांनी सांगितले