आजच्या श्यामच्या आईसाठी
By Admin | Updated: March 19, 2017 00:51 IST2017-03-19T00:51:53+5:302017-03-19T00:51:53+5:30
धनश्री लेले कबिराचा हवाला देत म्हणतात, ‘वरून थपडा मारत मारत पण आतून आधाराचा हात देत मडकं घडवायचं असतं. कच्चं मडकं मग पक्कं करण्यासाठी अनुभवाच्या

आजच्या श्यामच्या आईसाठी
- रविप्रकाश कुलकर्णी
धनश्री लेले कबिराचा हवाला देत म्हणतात, ‘वरून थपडा मारत मारत पण आतून आधाराचा हात देत मडकं घडवायचं असतं. कच्चं मडकं मग पक्कं करण्यासाठी अनुभवाच्या भट्टीत भाजायचं असतं. ते मडकं पक्कं होण्यासाठी शिशुरूपी कुंभाराला वेळ द्यायचा असतो. त्याचे अनुभव त्याला घेऊ द्यायचे असतात. त्या अनुभवाच्या भट्टीतून त्याला बाहेर काढण्याची घाई कुंभाराने करायची नसते. त्याने दिलेल्या आकारावर व केलेल्या संस्कारावर विश्वास हवा. काही अनुभवांची कितीही धग लागली तरी आपलं मडकं फुटणार नाही, याची त्याला खात्री हवी.
साने गुरुजीकृत ‘श्यामची आई’नं मागच्या पिढ्यांची जडणघडण नक्कीच केली. मनाचं भरणपोषण केलं. समोर एक आदर्श ठेवला. ज्याचं आकर्षण आजही वाटावं, म्हणूनच म्हटलं आहे-
मांगल्यासह प्रकाश देई
देवघरातील समई
महाराष्ट्राच्या घरोघरी वसे
तशी श्यामची आई!!
पण जग झपाट्यानं बदललं. विशेषत: अलीकडच्या काळात फारच झपाट्यानं. तरीही आज श्याम जसे आहेत तसंच श्यामच्या आईपण नक्कीच आहेत. मात्र आजच्या श्यामला त्याची आई किती वाट्याला येते? त्याचबरोबर श्यामच्या आईच्या वाट्याला तरी श्याम कितीसा येतो? दुहेरी पेचाचा हा प्रसंग आहे खरा याची जाणीव आजच्या कितीतरी श्यामच्या आईला आणि वडिलांना असणार. पण प्रकर्षानं बोच लागली ती व्यास क्रिएशनच्या नीलेश गायकवाड यांना. ते स्वत: ‘श्यामच्या आई’चे निस्सीम चाहते. ही गोष्ट घरोघरी पोहोचावी म्हणून त्यांनी ‘श्यामची आई’ पुस्तक वाटले आहे. जिथं वाचन
पोहोचणार नाही तेथे श्यामची आई चित्रपट दाखवला आहे. त्याच्या सिड्या वाटल्या आहेत.
हे सर्व कशापोटी? आजच्या श्यामची जडणघडण होण्यासाठी!
या काळजीला नवे वळण मिळाले. त्याला निमित्त होते श्यामची आई म्हणजे साने गुरुजींच्या आई - यशोदा
सदाशिव साने यांच्या स्मृतिशताब्दीचं वर्ष २ नोव्हेंबर १९१७. नीलेश गायकवाड यांनी हेरलं की, ‘श्यामची आई’ हे पुस्तक आज जसंच्या तसं देऊन चालणार नाही. कारण परिस्थितीत खूप बदल झाला आहे. यातून त्यांना श्यामच्या आईमधील कथाभाग सुटसुटीत करणं अगत्याचं वाटलं.
श्यामची आई पुस्तकाची कॉपी राईट गेल्यापासून अनेक प्रकाशकांनी ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे त्याच्या आवृत्त्या काढल्या. पण या आवृत्त्या बेजबाबदारपणे, निष्काळजीपणाने काढलेल्या दिसतात. या पार्श्वभूमीवर नीलेश गायकवाड यांनी सदर पुस्तकाचे नव्याने संपादन डॉ. मुरलीधर गोडे यांच्याकडून करून घेतले. यावरून गायकवाड आणि डॉ. मुरलीधर गोडे यांना सद्य:स्थितीचे भान आहे हे जाणवतं. पुस्तकासाठी नीलेश गायकवाड यांनी महाराष्ट्रात मुलांसाठी काम करण्यात वेगवेगळ्या प्रकारे सक्रिय आहेत त्यांना साद घातली ज्यात हेरंब कुलकर्णी, रेणू दांडेकर, अच्युत गोडबोले यांच्यापासून रेणू गावसकर, उमा दीक्षित, एकनाथ आव्हाड, धनश्री लेले, गिरिजा कीर, उत्तम कांबळे, उल्हास कोल्हटकर, अंजली बापट यांच्यासारख्यांनी या प्रश्नाची तीव्रता आणि त्यावर मात कशी करता येईल याबाबत विचारमंथन केले आहे.
हेरंब कुलकर्णी म्हणतात, ‘आजच्या मध्यम वर्ग - उच्च मध्यम वर्गात मुलांवर सुखाचा मारा होतो. त्यातून त्यांच्या संवेदना तरल राहत नाहीत. अभाव वाट्याला न आल्याने गरिबी, वंचितता याची वेदना कळत नाही किंवा आजूबाजूचे जग हेही सुखवस्तू असल्याने या गरिबांच्या जगण्याचा परिघच परिचित होत नाही. पुन्हा वाचन, संगीत, निसर्ग असे अनुभव बहुतेक घरांत न मिळाल्याने मुले टीव्ही, मोबाइल, कार्टून, दंगामस्ती असले स्वस्त आनंदाचे मार्ग शोधतात. परिणामी, त्यांची विचारशक्ती व संवेदना विकसित होत नाही.
धनश्री लेले कबिराचा हवाला देत म्हणतात, ‘वरून थपडा मारत मारत पण आतून आधाराचा हात देत मडकं घडवायचं असतं. कच्चं मडकं मग पक्कं करण्यासाठी अनुभवाच्या भट्टीत भाजायचं असतं. ते मडकं पक्कं होण्यासाठी शिशुरूपी कुंभाराला वेळ द्यायचा असतो. त्याचे अनुभव त्याला घेऊ द्यायचे असतात. त्या अनुभवाच्या भट्टीतून त्याला बाहेर काढण्याची घाई कुंभाराने करायची नसते. त्याने दिलेल्या आकारावर व केलेल्या संस्कारावर विश्वास हवा. काही अनुभवांची कितीही धग लागली तरी आपलं मडकं फुटणार नाही, याची त्याला खात्री हवी.
अशा तऱ्हेने आजच्या श्यामबाबत विचार मांडलेले आहेत. फरक इतकाच साने गुरुजी सांगतात ती गोष्ट. त्यामुळे ती ऐकता ऐकता वा वाचताना नकळत त्याचा संस्कार होतो - होऊ लागतो. तर आजच्या श्यामच्या निमित्ताने लिहिलेले अनुभव लेख पातळीवरच राहतात. ते बोधामृत वाटायला लागतं... याचा अर्थच आजच्या श्यामला घडवणं ही कठीण गोष्ट आहे, हेच खरं. पण यानिमित्ताने श्यामच्या आईकडे नव्याने, नव्या दृष्टीकोनातून पाहायला सुरुवात झाली. तरी पुष्कळ झाले.