तीन आरोपींची जन्मठेप रद्द
By Admin | Updated: June 4, 2014 01:06 IST2014-06-04T01:06:12+5:302014-06-04T01:06:12+5:30
अमरावती जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात सरकारी पक्ष संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन आरोपींची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे.

तीन आरोपींची जन्मठेप रद्द
हायकोर्ट : अमरावती जिल्ह्यातील हत्याप्रकरण
नागपूर : अमरावती जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात सरकारी पक्ष संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन आरोपींची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे.
राजेश गाडाभाई पटेल (३0) रा. गुजरात, मोहम्मद तौफिक मोहम्मद शब्बीर शाह (२८) व राजू रामा जयस्वाल (३३) दोन्ही रा. उत्तर प्रदेश अशी आरोपींची नावे आहेत. अचलपूर सत्र न्यायालयाने १९ जानेवारी २0१0 रोजी तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३0२ अंतर्गत जन्मठेप, तर कलम ३९२ अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील स्वीकारून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला.
मृताचे नाव बजरंग खंडेलवाल आहे. खटल्यातील माहितीनुसार, ३ मार्च २00८ रोजी रात्री ९ च्या सुमारास फिर्यादी गिरधारी सिरोया व बजरंग खंडेलवाल हे किराणा दुकान बंद करून घरी परतत होते. दोघांकडेही रोख रकमेच्या बॅगा होत्या. गोरक्षण धर्मशाळेजवळ पोहोचल्यानंतर अचानक तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाने गिरधारीकडील बॅग हिसकावून पळ काढला. गिरधारी त्याचा पाठलाग करीत काही दूर धावला. अन्य दोन आरोपी बजरंगसोबत हातापाई करीत होते. त्यांनी बजरंगला पिस्टलची गोळी झाडून ठार केले. तपासादरम्यान पोलिसांना सात आरोपींनी दरोड्याचा कट रचल्याची माहिती मिळाली. यामुळे त्यांनी सातही आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने उपरोक्त तीन आरोपींना शिक्षा ठोठावून अन्य आरोपींना निर्दोष सोडले होते. (प्रतिनिधी)