वीज प्रकल्पातील दुर्घटनेत तीन ठार
By Admin | Updated: October 8, 2016 04:40 IST2016-10-08T04:40:44+5:302016-10-08T04:40:44+5:30
औष्णिक वीज प्रकल्पात बॉयलर उभारताना झालेल्या दुर्घटनेत लोखंडी अँगल कोसळून तीन मजूर जागीच मृत्युमुखी पडले

वीज प्रकल्पातील दुर्घटनेत तीन ठार
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्याच्या आहेरवाडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात बॉयलर उभारताना झालेल्या दुर्घटनेत लोखंडी अँगल कोसळून तीन मजूर जागीच मृत्युमुखी पडले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराला घडली़ या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली़
सोलापूर शहरापासून अवघ्या
१५ किलोमीटर अंतरावर आहेरवाडी-फताटेवाडी परिसरात ‘एनटीपीसी’तर्फे औष्णिक वीज प्रकल्प उभारला जात आहे़ शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास युनिट २मध्ये बॉयलर उभारणीचे काम सुरू होते़ या वेळी काही मजूर दोरीच्या साहाय्याने बॉयलर उभा करण्याचा प्रयत्न करीत असताना दोरी तुटल्याने बॉयलरचा मुख्य ढाचा ढासळला, त्यात एकामागोमाग एक लोखंडी अँगल खाली काम करीत असलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळले़ यात राजबेर सिंग (२४, रा़ बिहार), गुरुप्रीतसिंग (२४, रा़ लोहार, पंजाब) आणि गुरुसेवक सिंग (१९) यांचा मृत्यू झाला़ पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभ आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत वळसंग पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़ (प्रतिनिधी)
>चौकशीसाठी मुंबईचे पथक : या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबईहून तज्ज्ञांचे एक पथक सोलापुरात येणार आहे़ या समितीत चार जणांचा समावेश असणार आहे़