ज्यांनी जुळवलं, त्यांच्याच घरावर तुळशीपत्र!
By Admin | Updated: September 25, 2014 09:16 IST2014-09-25T09:16:47+5:302014-09-25T09:16:47+5:30
दुसऱ्याच्या शेताची बटई करता करता स्वत:चंच शेत नांगरायचं राहून जावं, असाच काहीसा प्रसंग महायुतीतील घटक पक्षांवर गुदरला आहे.

ज्यांनी जुळवलं, त्यांच्याच घरावर तुळशीपत्र!
भाजपा-सेना युतीचा अजब न्याय : मित्रपक्षांच्या जागा घेतल्या परस्पर वाटून
नंदकिशोर पाटील
मुंबई : दुसऱ्याच्या शेताची बटई करता करता स्वत:चंच शेत नांगरायचं राहून जावं, असाच काहीसा प्रसंग महायुतीतील घटक पक्षांवर गुदरला आहे. राजकारणात हल्ली ‘व्यवहार’ महत्त्वाचा बनल्याने मोठ्यांनी छोट्यांचा घात करणं अथवा दगाबाजी करणं तसं आता नवं राहिलेलं नाही. हा अनुभव अगदी गावपातळीपासून ते थेट दिल्लीपर्यंत सगळीकडेच येतो. त्यात भारतीय जनता पार्टीसारखा ‘बनिया’ पक्ष असेल, तर मग ज्यांनी उदारी दाखवली, त्याचंच दुकानं नावं करण्यात त्यांच्याइतका हातखंडा दुसऱ्यांकडे नाही.
महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून जे काही सुरू आहे, ते पाहता ‘उडदामाजी काळेगोरे काय निवडावे बरे’ म्हणण्याची पाळी बिचाऱ्या मतदारांवर आली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठी डंकाबाजी करून रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांची मोट बांधून महायुती अस्तित्वात आली. तिच्या बळावर लोकसभेत अभूतपूर्व यशही संपादन केले. पण या यशातच ठगबाजी दडली असेल, असे तेव्हा कुणी जानले होते? अगदी जानकरांनाही याचा अंदाज नसावा. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे शिवसेना-भाजपाच्या नेत्यांचे वारू चौखूर उधळू लागले आहेत. पण या यशात घटक पक्षांचादेखील खारीचा वाटा होता याचा विसर त्यांना पडलेला दिसतो. मुख्यमंत्रिपदाची दिवास्वप्नं बघणाऱ्यांना घरात लागलेल्या आगीची फिकीर नाही. तसे नसते तर २८८ जागांची वाटणी एका बैठकीत झाली असती. पण थोरला आणि धाकल्याच्या वादात मधल्यांचा जीव गुदमरून गेला.
शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्रिपदावर डोळा आहे. त्यामुळे कुणीच दोन पावलं मागे येण्यास तयार नाही. शिवसेनेत म्हणे, आदित्य ठाकरे यांनी आखलेल्या ‘मिशन १५०’ला धक्का लागता कामा नये, अशी उद्धवची भूमिका आहे. तर काहीही करून सेनेला १५० द्यायच्या नाहीत, असा भाजपा नेत्यांचा पण आहे. त्यामुळेच युतीची पत्रिका जुळत नव्हती. अखेर घटक पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवून ‘आमच्या वाट्याच्या जागा घ्या, पण युती टिकवा’, असा आग्रह धरल्याने भाजपा-सेनेने परस्परच जागा वाटून घेतल्या. घटक पक्षांना फक्त ७ जागा दिल्या. हे म्हणजे लग्न जुळविणाऱ्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याचाच प्रकार!
महायुतीतील घटक पक्षांची ताकद काय, त्यांना हरण्यासाठी का जागा सोडायच्या, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. वरवर पाहता ते खरे वाटू शकते. पण राजकीय व्यवहार असा तोलकाट्यावर मोजला जात नाही. आधीच्या मापातही कोणाचा वाटा किती होता, हे तपासून घ्यावे लागते. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची खरी ताकद कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा ऊसपट्ट्यात आहे, जिथे सेना-भाजपाला आजवर कधीही टिपरू टाकता आलेले नाही़ शिराळ, शाहूवाडी, इस्लामपूर, पलूस-कडेगाव, चंदगड, कऱ्हाड उत्तर, माढा, पंढरपूर, करमाळा, तासगाव-कवठेमहांकाळ अशा किमान दहा-अकरा मतदारसंघांत स्वाभिमानीचे कायकर्ते निकाल फिरवू शकतात. शिराळामधून शिवाजीराव नाईक, शाहूवाडीतून स्वत: सदाभाऊ खोत, चंदगड-राजेंद्र गड्डेनवार, राधानगरी-जालिंदर पाटील आणि शिरोळमधून उल्हास पाटील असे तगडे उमेदवार त्यांच्याकडे आहेत.
सोलापूर, सातारा आणि नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या भागात धनगर समाजाच्या माध्यमातून जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद आहे. खानापूर, बारामती, इंदापूर, मान-खटाव आणि श्रीगोंदा मतदारसंघांत त्यांच्याकडे तगडे उमेदवार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवून स्वत: जानकरांनी ४ लाख ५१ हजार मते घेतली. यावरून तरी त्यांच्या प्रभावाचा अंदाज येऊ शकतो.
रामदास आठवले यांच्या रिपाइंने २००९च्या निवडणुकीत ७९ जागा लढवून एकही जागा जिंकली नाही. १९९९च्या निवडणुकीचा अपवाद वगळता आठवलेंना कोणत्याच निवडणुकीत फारसे यश संपादन करता आले नाही. पण असे असले तरी आठवलेंची फौज किमान एक-दोन टक्के मते फिरवू शकते. विशेषत: मराठवाडा आणि मुंबईतील काही मतदारसंघांत त्यांचा टक्का निकालावर परिणाम करू शकतो.
शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची नेमकी राजकीय ताकद किती, हा तसा संशोधनाचाच विषय. कधी काळी गोपीनाथ मुंडे यांचे उजवे हात असलेले मेटे राष्ट्रवादीच्या कळपात शिरून शरद पवारांचे कट्टर समर्थक बनले. मेटेंची राजकीय महत्त्वाकांक्षा कधी लपून राहिलेली नाही. राष्ट्रवादीत असतानाही ते स्वत:ची शिवसंग्राम संघटना चालवित होतेच. या संघटनेचा फायदा कमी आणि उपद्रवच अधिक झाल्याने पवारांनी त्यांना बाजूला सारले. पण मेटेंनी गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणाचा विषय लावून धरला. त्यांच्या दबावामुळेच सरकारला आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागला, हे खरेच. पण ‘होमग्राउंंड’ असलेल्या बीड जिल्ह्यात मेटे किती प्रभावशाली ठरू शकतात, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. त्यांच्याकडे शिवसंग्रामच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची तगडी कुमक आहे. निवडणुकीत अशा फौजेचीही गरज असतेच की! निवडणुकीत आघाडी करताना घटक पक्षांना त्यांच्या कुवतीनुसार जागा मिळतातच असे नाही. अनेकदा घटक पक्षांचे नेतेसुद्धा विधान परिषद, महामंडळावर वर्णी अशा गाजरांना भुलून गळ्यातील उपरणे उतरवून ठेवतात. त्याहून अगदीच खरे सांगायचे, तर जागा मिळाली तरी समोरच्या तगड्या उमेदवाराशी मांडवली करून मोकळे व्हायचे! आघाडी वा युतीतील छोट्या पक्षांच्या नेत्यांचा हा ‘व्यवहार’च अनेकदा त्यांना व त्यांच्या समर्थकांना नडतो. त्यांनी आपले नाणे खणखणीत ठेवले, तर निवडणुकीअगोदर नांगरलेली जमीन ऐन पेरणीच्या वेळी बटईने देण्याची वेळ त्यांच्यावरही येणार नाही.
२००९ : पक्षांची कामगिरी
पक्ष एकूण जागा लढविल्या विजयी जागा
रिपाइं (आठवले गट) ७९ ०
राष्ट्रीय समाज पक्ष २६ ०१
स्वाभिमानी संघटना १४ ०१