एका दिवसात तीस हजार वृक्षलागवड

By Admin | Updated: July 2, 2016 03:03 IST2016-07-02T03:03:54+5:302016-07-02T03:03:54+5:30

शहरीकरणामुळे होणाऱ्या विकासापाठोपाठ पर्यावरणाचा ऱ्हास होत असून वृक्षछाटणीचे प्रमाण वाढले आहे.

Thirty thousand trees in a single day | एका दिवसात तीस हजार वृक्षलागवड

एका दिवसात तीस हजार वृक्षलागवड


नवी मुंबई : शहरीकरणामुळे होणाऱ्या विकासापाठोपाठ पर्यावरणाचा ऱ्हास होत असून वृक्षछाटणीचे प्रमाण वाढले आहे. राज्य शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्र मात शुक्रवारी नवी मुंबई महानगरपालिका, सामाजिक संस्था, शासकीय इमारती, शाळा-महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे तसेच या हरितसंपत्तीचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक विभागात वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात आली. हवामान, पाण्याची उपलब्धता व भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन प्रदूषण नियंत्रणासाठी, शहर सौंदर्यीकरणासाठी व जल संवर्धनासाठी सावली देणाऱ्या आणि फळ-फळावळ देणाऱ्या वृक्ष प्रजाती, ज्यामध्ये प्रामुख्याने आंबा, चिंच, आवळा, कवठ, काजू, फणस, वड, पिंपळ, निम, पळस, गुलमोहर, बांबू, बोर, चाफा आदी रोपांची लागवड करण्यात आली. या कार्यक्र मासाठी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि सुदृढ रोपे महानगरपालिका, सामाजिक वनीकरण विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली.
रबाळे येथील मुंब्रादेवी डोंगरावर राजर्षी शाहू महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत एक हजारहून अधिक वृक्षरोपे लावली. उपमहापौर अविनाश लाड यांनी वाशी मिनी सी शोअर परिसरात, सभागृह नेते जयवंत सुतार यांनी शिरवणे शाळा परिसरात, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी इलठणपाडा परिसरात वृक्षारोपण केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व वृक्षप्राधिकरण सदस्यांसह नगरसेवकांनी आपापल्या प्रभाग क्षेत्रात तेथील स्वयंसेवी संस्था, वृक्षप्रेमी नागरिक यांच्यासह उत्साहाने वृक्षारोपण केले. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण आणि महापालिका अधिकारी यांनी बेलापूर पारसिक हिल परिसरात शालेय विद्यार्थ्यांसह वृक्षारोपण केले. ऐरोली सेक्टर ६ येथील जागृती महिला मंडळाच्या वतीनेही वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.
घणसोली येथे भाजपाच्या नगरसेविका उषा पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सेक्टर ४ मधील मोकळी जागा, शाळांचे मैदान तसेच पोलीस चौकीभोवती वृक्षारोपण करण्यात आले. तसेच इमारत आवारात व दुकानांसमोर लावण्यासाठी देखील झाडांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पुरुष व महिलांसह तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या उपक्रमाला हातभार लावला. (प्रतिनिधी)
>विशेष मुलांनीही
केली वृक्षलागवड
महानगरपालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे विशेष विद्यार्थी या पर्यावरणशील उपक्र मात उत्साहाने सहभागी झाले होते. ७ ठिकाणी वृक्षारोपण करून वृक्षांची गरज किती आहे हे देखील यामध्ये दर्शविण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसह ४०० हून अधिक शाळांमध्ये ४ हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.

Web Title: Thirty thousand trees in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.