जनहिताआड येणारे कायदे बदललेच पाहिजेत
By Admin | Updated: April 23, 2017 03:22 IST2017-04-23T03:22:28+5:302017-04-23T03:22:28+5:30
जवळपास शंभर वर्षे जुन्या असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात कायदे आणि नियमांचा अडसर आपल्या सरकारने दूर केला. जनहिताआड येणारे कायदे आणि नियम हे बदललेच पाहिजेत

जनहिताआड येणारे कायदे बदललेच पाहिजेत
मुंबई : जवळपास शंभर वर्षे जुन्या असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात कायदे आणि नियमांचा अडसर आपल्या सरकारने दूर केला. जनहिताआड येणारे कायदे आणि नियम हे बदललेच पाहिजेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा पुनर्विकास प्रकल्प कमीतकमी कालावधीत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
वरळी आणि नायगाव येथील या चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन शनिवारी वरळीतील जांबोरी मैदानावर आयोजित समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र वायकर आदी मंचावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, कायदे, नियम हे माणसांसाठी असतात आणि जनहितासाठी ते बदलले पाहिजेत, या भूमिकेतून आम्ही काम केले. आधीच्या काळात या चाळींकडे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले गेले. अनेक लांडगे या चाळींकडे सावज म्हणून पाहत होते आणि एकमेकांचे पाय ओढत राहिले. त्यामुळे पुनर्विकास रखडला. आम्ही मात्र, येथील रहिवाशांना उत्तमोत्तम काय देऊ शकू याचाच विचार केला.
प्रकाश मेहता, रवींद्र वायकर, स्थानिक आमदार सुनील शिंदे, काँग्रेसचे आ.कालिदास कोळंबकर, म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी झोकून दिल्याने आणि चाळवासीयांच्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प आता होऊ घातला आहे. प्रत्येकाला ५०० चौरस फुटांचे हवेशीर घर दिले जाईल. हा देशातील सर्वात मोठा आणि सर्वोत्तम असा पुनर्विकास प्रकल्प असेल. कोणताही बिल्डर नाही, तर म्हाडा हा पुनर्विकास करेल. प्रकल्पाबाबतच्या चाळवासीयांच्या प्रत्येक शंकेचे निरसन केले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
चाळकऱ्यांनी दोनअडीच वर्षे अन्यत्र राहून अडचण सहन करावी. त्या काळात हालअपेष्टा झाल्याच, तर आम्हाला शिव्या द्या, पण पुढच्या ५० वर्षांचा विचार करून बांधलेली उत्तम घरे आम्ही तुम्हाला देणारच आहोत, म्हणून आशीर्वाददेखील द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. चाळकरी हे भाडेकरू नसून, येथील घरांचे मालक आहेत आणि बीडीडी चाळ या मुंबईच्या इतिहास व संस्कृतीचा भाग आहेत हे समोर ठेऊनच चांगल्या घरांची उभारणी म्हाडामार्फत केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एखाद्या बांधकामासाठी जादा एफएसआय देण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर सरकार बिल्डरधार्जिणे असल्याचा आरोप माध्यमांकडून होतो, पण उपलब्ध जागेचा महत्तम वापर करण्यासाठीचे सूत्र आता जगाने मान्य केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे देण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
या वेळी सुभाष देसाई, प्रकाश मेहता, रवींद्र वायकर, आ.सुनील शिंदे आदींची भाषणे झाली. आ. मंगलप्रभात लोढा, आ. आशिष शेलार, आ.योगेश सागर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, माजी मंत्री दत्ता राणे, सुनील राणे, शायना एनसी, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, अतिरिक्त मुख्य सचिव (गृहनिर्माण) संजयकुमार आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
श्रेयासाठी युतीमध्ये चढाओढ
बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेमध्ये चढाओढ लागली आहे. वरळी, नायगाव परिसरात दोन्ही पक्षांनी त्याबाबत बॅनर लावले आहेत. शनिवारी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सुभाष देसाई, आमदार सुनील शिंदे यांच्या भाषणावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली, तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा जयघोष केला. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना, मैदानाच्या बाहेर काही जणांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्यांना पिटाळून लावले.
६८ टक्के जमिनीचा वापर चाळकऱ्यांसाठी
बीडीडी चाळींच्या जमिनीपैकी ६८ टक्के जमिनीचा वापर हा चाळकऱ्यांची घरे बांधण्यासाठी केला जाईल. केवळ ३२ टक्के जमिनीचा व्यावसायिक वापर केला जाईल. मात्र, आधी चाळकऱ्यांना घरे दिली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.