घर विक्रीला प्रतिसाद नाही
By Admin | Updated: October 31, 2016 02:45 IST2016-10-31T02:45:33+5:302016-10-31T02:45:33+5:30
दसऱ्यापाठोपाठ दिवाळीतही घर खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने विकासक हवालदिल झाले आहेत.

घर विक्रीला प्रतिसाद नाही
नवी मुंबई : दसऱ्यापाठोपाठ दिवाळीतही घर खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने विकासक हवालदिल झाले आहेत. ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी जाहिर केलेल्या विविध आकर्षक योजनाही फोल ठरल्या आहेत. त्यामुळे वर्षेनुवर्षे पडून असलेल्या मालमत्तांचे करायचे काय, असा सवाल शहरातील विकासकांना पडला आहे.
नवी मुंबईत दिवसेंदिवस घरांची मागणी वाढत आहे. परंतु शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने स्वस्त व परवडणारी घरे बांधणे विकासकांना अवघड होऊन बसले आहे. मागणी व पुरवठा यात मोठ्याप्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन-तीन वर्षापासून घरांची मागणी कमलाची मंदावली आहे. मालमत्ता विकल्या न गेल्याने बिल्डर्स आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रूपये अडकून पडले आहेत. त्यामुळे रियल इस्टेट मार्केटवर चिंतेची काजळी पसरली आहे. परंतु अंतराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, नैना क्षेत्रातील प्रस्तावित पयाभूत सुविधा व नव्यानेच स्थापण झालेली पनवेल शहर महापालिका आदीबाबी बांधकाम उद्योगाला दिलासा देणाऱ्या ठरल्या आहेत. याचा परिणाम म्हणून गेली तीन-चार वर्षे केवळ प्रतिक्षेत असणारा ग्राहक आता बाहेर पडेल, असा विकासकांचा व्होरा आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीचा मुहर्त विकासकांना अशादायी वाटत होता.
परंतु दसऱ्या पाठोपाठ दिवाळीतही ग्राहकांनी घर खरेदीला अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने रियल इस्टेट क्षेत्रात पुन्हा चिंतेची काजळी पसरली आहे. विशेष म्हणजे अनेकांनी ग्राहकाअभावी धूळ खात पडून असलेल्या आपल्या मालमत्ता विक्रीसाठी काढल्या आहेत. ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध योजना जाहिर केल्या होत्या. काहींनी तर घर खरेदीसाठी नोंदणी रकमेवर चक्क डिस्काउंट देवू केले आहे. तर अनेकांनी आपल्या नवीन गृहप्रकल्पातील घर नोंदणीवर आकर्षक सवलत जाहिर केल्या होत्या. परंतु ग्राहकांनी पाठ फिरविल्याने या सर्व योजना फोल ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)
>३0 हजार मालमत्ता विक्रीअभावी पडून
मागील काही वर्षात मालमत्तांच्या
वाढलेल्या किमतीमुळे ग्राहकांनी घर खरेदीकडे पाठ फिरविली आहे. याचा प्रत्यक्ष फटका रियल इस्टेट मार्केटला बसला आहे. कारण गेल्या काही वर्षापासून विविध क्षेत्रफळाच्या सुमारे तीस हजार मालमत्ता विक्रीअभावी पडून असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यात हजारो कोटींची गुंतवणूक असून त्यामुळे गुंतवणूकदार आणि विकासक धास्तवले आहेत.